नव्या आकृतिबंधाप्रमाणे बारावीचे वर्ग उघडणार
मुंबई, दि. 10 – बारावीचे वर्ग नव्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात घेतले जातील. 10+2+3 या नव्या आकृतीबंधाप्रमाणे बारावीस ज्युनिअर कॉलेजमधील दुसरे वर्ष असेही म्हणण्यात येते. महाविद्यालयांना नवीन वर्ग उघडण्यास सांगण्यात आले असून विद्यार्थ्यांची संख्या पाहून त्या प्रमाणात त्यांनी वर्ग उघडावयाचे आहेत. महाविद्यालयातील तुकडीत 50 ते 100 विद्यार्थी असतील, अधिक तुकड्या उघडावयाच्या असतील तर त्यात 80 विद्यार्थी असतील.
लोकहितवादींनी सांगितलेले पुरुषार्थ आजही उपयुक्त
पुणे – लोकहितवादींनी त्यांच्या काळात मांडलेले विचार आणि विद्या, धर्म, द्रव्य व परोपकार हे चार पुरुषार्थ आजच्या काळातही आचरणात आणण्यासारखे आहेत, असे विचार प्रा. सरोजनी वैद्य यांनी मांडले. जीवनातील सर्व क्षेत्रांचा आत्मविष्कार लोकहितवादीच्या लेखनात झालेला आहे. इंग्रजी भाषेतून जेवढे म्हणून ज्ञान मिळवता येईल तेवढे मिळवायचे व समाजापुढे मांडायचे. भोवतालच्या समाजातील स्थित्यंतराचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात होते.