अरुण गोखले
आपण प्रापंचिक जीव. आपल्या मागे घरदार, बायको, मुले, आई-वडील, नोकरी, धंदा, व्यवसाय, त्याच्या विवंचना या आहेतच. त्यामुळेच आम्हास देवाचे नाव घ्यायला, त्याची भक्ती करायला, त्याच्याशी सख्य साधायला जमत नाही, अशा अनेक सोयीस्कर सबबी आहेत. पण जे खरे मार्गदर्शक, हितचिंतक, सद्गुरू असतात ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अर्जुनास श्री हरीने भक्तीचे गुज सांगताना हेच सांगितले की, “ययां अठरा प्रहरा माझारी। मोटके निमिष भरी दे तू जाय।।’ म्हणजे काय कर! तर तुम्ही तुमच्या दिवसाच्या सगळ्या यातायाती झाल्या की थोडासा वेळ तरी मला दे. माझे स्मरण कर.’
असाच बोध तुम्हा-आम्हाला संत, सद्गुरू करतात. ते म्हणतात की, बाबारे तू संसारी असूनही ईश्वरभक्ती करू शकतोस. केव्हा माहीत आहे? हे बघ, तुझी दिवसाभराची संसाराची सर्व यातायाती झाली. रात्रीचं जेवण झालं आणि तू निजण्यासाठी अंथरुणावर जाऊन बसलास ना की उगाच झोप येईपर्यंत आढ्याकडे पाहात अंथरुणावर पडण्यापेक्षा किंवा नसते विचार करण्यापेक्षा तू काय कर, तर निवांत बस. डोळे मिटून माझ्या रूपाचे ध्यान कर. माझे रूप आठव. त्या रूपास नामाची जोड दे. नामरूपाच्या जोडीने हळूहळू तुझे चित्त हे त्या नामात रमायला लागेल. तुझे अस्थिर, अशांत मन हे शांत आणि स्थिर होईल.
पण तू हे जे काही करशील ते कसे कर, तर “आवडी अनंत आळवावा’. म्हणजे काय! तर हा आठव, हे नामस्मरण तू चित्ताच्या आवडीने कर. लक्षात घे की, एकदा का तुझ्या चित्ताला याची आवड लागली की तुझं मन हे आपोआपच या संसारातून तुझ्या या नामसाधनेसाठी सवड काढायला लागेल. तुला त्याची गोडी लागेल. बाबांनो! किती केलं याला महत्त्व नसून ते किती मनापासून आवडीने केले याला महत्त्व असते. देव हा तुमच्या शुद्ध भक्तिभावाचा भुकेला असतो. तुम्ही त्याला साद घातली ना की त्याचा प्रतिसाद हा मिळणारच. मात्र, हा दृढविश्वास तुमच्या मनात असायला हवा.