अप्रत्यक्ष कराचा बोजा चालू ठेवणे हेच देशहिताचे
मद्रास, दि. 19 – सध्याची देशाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता नजीकच्या भविष्य काळात अप्रत्यक्ष कराचा बोजा कमी करणे शक्य होणार नाही, असे केंद्रीय अर्थखात्याचे राज्यमंत्री मुखर्जी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रत्यक्ष कराकडे आर्थिक धोरण झुकले तर ठीक होईल, पण आज अप्रत्यक्ष कर व तुटीचे अर्थकारण यात निवड करावयाची आहे.
म्हणून अप्रत्यक्ष कर हेच कायम ठेवावे लागणार आहेत. प्रत्यक्ष करापासून मिळणारे उत्पन्न त्या मानाने फारच थोडे मिळेल. शिवाय अप्रत्यक्ष करामुळे भाववाढीवर विशिष्ट क्षेत्रातच परिणाम होतो. चैनीच्या वस्तू महाग झाल्यामुळे त्यांची मागणी मर्यादित होते.
तेजस्वी तरुण निर्माण करणारे चित्रपट हवेत
मिरज – तरुणांनी असे चित्रपट पाहावेत की, ज्या चित्रपटांमुळे पौरुष, जिद्द निर्माण होईल. तेजस्वी तरुण निर्माण होतील. आता प्रेमगीते नकोत राष्ट्रीय गीते हवीत. कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे अभंग आपल्या तोंडी आले पाहिजे, असे उद्गार प्रसिद्ध सिनेनट शाहू मोडक यांनी काढले.
बिहार लढ्यास पाठिंबा
पुणे- लोकशाहीत केवळ मतदानालाच महत्त्व नाही तर जनतेचे सार्वभौमत्व महत्त्वाचे असून वेळोवेळी आपले मत व्यक्त करण्याचा जनतेला अधिकार आहे. याच दृष्टीने बिहार लढ्याकडे पाहिले पाहिजे, असे उद्गार समाजवादी नेते सदाशिव बागाईतदार यांनी काढले.