निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी खाते असावे
बंगलोर, दि. 23 – लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्ष कसा खर्च करीत आहेत, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र खाते निर्माण करावे, अशी सूचना जनता पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई यांनी केली आहे. 1926-37 साली माझ्या सुरत मतदारसंघात असे एक मंडळ नेमण्यात आले होते. भ्र
ष्टाचार टाळण्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च सरकारनेच करावा अशी सूचना करून पश्चिम जर्मनीत अशी पद्धत असल्याचे देसाई यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी एकच व्यक्ती असू नये; किमान 3 व्यक्ती असाव्यात असेही त्यांनी सुचविले. शक्यतो न्यायमूर्तींची या पदावर नेमणूक करावी, असे ते म्हणाले.
पुढील महिनाअखेरपर्यंत खाद्यतेल टंचाई दूर होणार
नवी दिल्ली – देशात खाद्यतेलाच्या बाबतीत परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली असून पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत तेल पुरेसे उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात खाद्यतेल आयतीबाबतचे निर्बंध शिथिल केल्यानंतर सुमारे 275 कोटी रुपयांच्या आयातीचे परवाने देण्यात आले आहेत. ही आयात झाल्यानंतर पुरेसा पुरवठा होऊ शकेल.
भाववाढीने कामगार अतिशय त्रस्त
मुंबई – सक्तीच्या बचत योजनेखाली कामगारांच्या पगारातून कापून घेण्यात आलेली रक्कम कोणतीही दिरंगाई न करता परत करावी, अशी मागणी इंटकचे नेते एच. एन. त्रिवेदी यांनी केली. भडकत्या किमतीमुळे कामगार वर्ग त्रस्त झाला असून त्यांच्या बचतीची रक्कम मिळावी.