फराक्का प्रकरणी भारत-बांगलादेश समझोता करार
नवी दिल्ली, दि. 27 – फराक्का जलाशयातील गंगा पाणी वाटपावरून भारत व बांगलादेश यांच्यात असलेल्या वादात आज रात्री समझोता झाला. आज मध्यरात्री करारावर सह्या होत आहेत. या समझोत्यान्वये, कलकत्ता बंदरास आवश्यक तेवढा पाण्याचा पुरवठाही होईल व बांगलादेशाचे हितसंबंधही सांभाळले जातील.
एप्रिल 21 ते एप्रिल 30 या “कोरड्या’ काळात भारत व बांगला देश यांना अनुक्रमे 37.5 टक्के व 62.5 टक्के पाणी मिळेल. नंतर भारताला मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वेगाने वाढ होईल व तो 40 हजार क्युसेक इतका होईल. बराच दिवसांपासून हा वाद सुरू आहे. या वादावर आता समझोता झाल्याने पुढे वाद टळतील.
भात व तांदळाची देशभर मुक्त वाहतूक
नवी दिल्ली – चालू वर्षी 1 ऑक्टोबरपासून भात व तांदळाची देशात मुक्त वाहतूक करता येईल. खरीप हंगामासाठी किमती व खरेदी धोरण जाहीर करताना केंद्रीय पाटबंधारे व शेतीमंत्री सुरजित बर्नाला म्हणाले, भात व तांदळावरील सर्व विभागीय नियंत्रणे उठविण्यात येतील. डाळींचे उत्पादन वाढण्यासाठी 1977-78 सालात डाळींच्या आधार किमतीत वाढ करण्याचे ठरविले आहे.
ही वाढ 95 रुपये क्विंटलवरून 125 रुपये क्विंटल इतकी राहील. येत्या काही दिवसांतच डाळीचे लागवडीस सुरुवात होईल. सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना उत्पादनवाढीस प्रोत्साहन मिळेल. मुक्त वाहतुकीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात भात व तांदूळ पुरविला जाईल.