भारताने दिलेला गहू रशियाला पसंत
बंगलोर, दि. 27 – गव्हाचे बदली गहू या तत्त्वानुसार भारताने दिलेला गहू रशियाने मान्य केला आहे, असे केंद्रीय शेतकी मंत्री सूरजितसिंग बर्नाला यांनी सांगितले. रशियाला एकूण 15 लाख टन गहू भारताने परत करावयाचा आहे व या गव्हाची प्रत चांगली असल्याचे रशियाने तपासणी करून मान्य केले आहे. आता हा गहू कोठून, कसा व केव्हा न्यावयाचा ते वाटाघाटीनी ठरवावयाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळाची स्थापना
नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. प्रतापचंद्र चंदर यांनी असे जाहीर केले, की देशातील लाखो निरक्षरांना साक्षर करण्याचे महाकठीण कार्य करण्यासाठी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे.
पीटीआय वृत्तसंस्था स्वायत्त करा
नवी दिल्ली – समाचार वृत्तसंस्था मोडून तिच्या दोन संस्था कराव्यात अशी सूचना तज्ज्ञ समितीने केली. त्यावर पीटीआय स्वायत्त संस्था बनवावी, अशी मागणी होत आहे.