नवी दिल्ली: तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभाशी संबंधित असलेले सुमारे 400 जणांना करोना विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. बुधवारपासून एकूण 328 जण करोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी दैनंदिन वार्तालापादरम्यान सांगितले. आतापर्यंत देशभरात करोनाची लागण झाल्याची 1,965 प्रकरणे उघड झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांशी तातडीने संपर्क साधण्यात यावा आणि युद्धपातळीवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी सूचना काल मंत्रिमंडळाच्या सचिवांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांबरोबर केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान केल्या असल्याचे अगरवाल म्हणाले. आतापर्यंत शोधून काढलेल्या सदस्यांच्या चाचण्यांद्वारे सुमारे 400 “पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले आहेत. यात तामिळनाडूचे 173, राजस्थानचे 11, अंदमान आणि निकोबारचे 9, दिल्लीचे, 47, पुद्दुचेरीचे 2, जम्मू-काश्मीरचे 22, तेलंगणामधील 33, आंध्र प्रदेशचे 67 आणि आसाममधील 16 जणांचा समावेश आहे. तपासणीसाठी अधिक नमुने घेण्यात येत असल्याने ही संख्या वाढत असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
धारावीसंदर्भात बोलताना करोनाबाधित रुग्ण सापडलेली इमारत सीलबंद करण्यात आली असून नियमाप्रमाणे संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत, असेही अगरवाल यांनी सांगितले.