सासवड -काश्मीरमधील पुलवामामध्ये 40 भारतीय जवानांची हत्या करून आपला उद्देश मोदी सरकारने साध्य करून घेतला असल्याचा घाणाघाती आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर शेतकरी व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, मध्यंतरी पुलवामा भागात चाळीस जवान शहीद झाले. यामागची गोष्ट जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी समोर आणली. मलिक यांची राज्यपालपदी नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. त्यावेळी जवानांना आवश्यक साधने, विमाने वेळीच पुरवली गेली नसल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. मलिक यांनी देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या हे कानावर घातले तेव्हा याबाबत कुठे बोलू नये, असे सांगण्यात आले होते.
शरद पवार म्हणाले की, महागाई, बेकारीचे संकट आहे. तसेच अनेक गोष्टी देशात घडल्या तरी खऱ्या अर्थाने त्यांची वस्तूस्थिती देशासमोर मांडली गेलेली नाही. संपूर्ण देशात कोणता वर्ग अस्वस्थ आहे हा प्रश्न विचारला तर अनेक लोक पुढे येतात. पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम आज कशामुळे होतोय आणि देशात आत्महत्येसारख्या संकटामध्ये कोणता वर्ग आहे पाहिले तर शेतकऱ्यांचा विचार पुढे येतो. शेतकरी आज अडचणीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तर सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
देशाच्या जवानांचे रक्षण करण्याची जबाबदारी देशाच्या सरकारवर आहे. ती सुद्धा पार पाडायची नाही अशी भूमिका जे सरकार घेते त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्यासाठी पुढील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले.
अजून मदतीचा पत्ता नाही
नाशिक जिल्ह्यातही गारपिटीने, पावसाने टोमॅटो, द्राक्ष, कांद्यासारखी अनेक पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे पंचनामे झाल्याचे सरकारने सांगितले, तरीही तिथे अजूनही मदतीचा पत्ता नाही. अशा संकटग्रस्तांना मदत नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले.