राज्य आपत्ती नियंत्रण विभागाची माहिती
मुंबई – पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 48 हजार नागरिकांना हलविण्यात आले असून या पूरबाधित नागरिकांसाठी 372 तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 32 पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण 105 बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
पूरग्रस्तांना महामंडळांकडून 20 लाखांची मदत
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश आदी भागात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे. या नागरिकांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दोन्ही महामंडळातर्फे प्रत्येकी 10 लाख अशी एकूण 20 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे. तसेच पूरग्रस्त भागातील पशूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय डॉक्टरांची पथके पाठविली असून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला असल्याचेही जानकर यांनी सांगितले.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 54, तर सांगली जिल्ह्यात 51 पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.
राज्यातील 10 जिल्ह्यांमधील 4 लाख 48 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार, तर सांगली जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार नागरिकांचा समावेश आहे.
पूरबाधित जिल्ह्यांमध्ये 226 बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बाधीत नागरिकांसाठी 372 तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 70 तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या 761 इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.