कोलकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षांच्या राजवटीत तब्बल 35 हजार उद्योजक देश सोडून गेले, असा सनसनाटी दावा पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी गुरूवारी केला. त्यासाठी त्यांनी तीन संस्थांच्या अभ्यास अहवालांचा आधार घेतला.
देशातून 2014 ते 2018 या कालावधीत 23 हजार उद्योजक परदेशांत गेले. त्यानंतर 2019 मध्ये 7 हजार, तर 2020 मध्ये 5 हजार उद्योजक देश सोडून गेले. उद्योजकांच्या स्थलांतरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर राहिला. भयाच्या मानसिकतेतून ते घडले का, असा सवाल मित्रा यांनी ट्विटरवरून केला.
उद्योजकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराविषयी मोदींनी संसदेत श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी भारतीय उद्योग जगताविषयी टीकाटिप्पणी केली होती. भारतीय उद्योग जगताची व्यावसायिक कार्यपद्धती राष्ट्रहिताच्या विरोधातील असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचा उल्लेखही मित्रा यांनी केला. तसेच, मोदींनी गोयल यांना कानपिचक्या न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.