अहमदाबाद – गुजरातच्या धंदुका, बरवाला आणि अहमदाबाद ग्रामीण भागात विषारी दारूच्या सेवानामुळे 35 जणांचा मृत्यू झाला असून, अन्य 40 जणांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी आहे. या सगळ्यांना भावनगर आणि अहमदाबादच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून पोलीस महासंचालक आशिष भाटीया यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दखल घेतली असून, 24 तासांत त्यांनी अहवाल मागवला आहे. तर कॉंग्रेसचे गुजरात अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राज्यात दारूबंदीच्या नावाखाली केवळ हफ्तावसुली सुरू असल्याचा आरोप भारतीय ट्रायबल पार्टीचे आमदार महेश वसावा यांनी केला आहे. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदत दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मिथाईल अल्कोहोलच्या जादा सेवनामुळे हा प्रकार झाला असल्याचे भाटीया यांनी सांगितले. या प्रकरणात 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बहुतेक जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
औषधी,वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही – मुख्यमंत्री शिंदे
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गुजरातमध्ये असून त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असताना असे प्रकार घडतातच कसे असा सवाल त्यांनी केला आहे.
“विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर”