नवी दिल्ली – अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मोदी सरकारकडून सध्या विरोधी पक्षांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा जो सातत्याने गैरवापर होतो आहे त्या प्रकरणात त्यांना लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. मंगळवारी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे, या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस व अन्य राजकीय पक्षांनी राष्ट्रपतींना हे पत्र लिहीले आहे.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात, नेत्यांनी सरकारच्या हट्टी वृत्तीचा मुद्दादेखील उपस्थित केला आहे. सरकार महागाई आणि जीएसटी दरवाढ या मुद्द्यावर तातडीची चर्चा होऊ देत नाही असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
कॉंग्रेस, द्रमुक, सपा या नेत्यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात म्हटले आहे की, सरकारकडून विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून त्यांचा गैरवापर केला जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची गरज आहे. आम आदमी पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांनीही राष्ट्रपतींना हे पत्र पाठवले आहे.
नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवून दिली कार
विरोधकांविषयी संशयाचे वातावरण निर्माण करणे, त्यांची बदनामी करणे आणि आपल्या विरोधात लढणाऱ्या राजकीय शक्तींना कमकुवत करणे हाच सरकारचा या कारवाई मागचा एकमेव उद्देश आहे, असेही या पक्षांचे म्हणणे आहे. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, आपचे संजय सिंह, आरजेडीचे मनोज झा, सीपीआय-एमचे एलामाराम करीम (सीपीआय-एम) आणि सपाचे राम गोपाल यादव यांचा समावेश आहे.
फारूख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ; मनी लॉंडरींग प्रकरणात आरोपपत्र दाखल