रेडा – इंदापूर शहरात तालुक्यातील सुमारे 140 गावांतील नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. शहराची सीमा वाढीव हद्दीत पसरल्याने शहराची लोकसंख्या तीस हजारांवर गेली आहे. मुलभूत सुविधा प्रचंड वाढल्या आहेत. नगर परिषदेच्या माध्यमातून एक दिवसाआड पाणी सोडले जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना संथगतीने सुरू असल्यामुळे पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे.
इंदापूर शहराला उजनी जलाशयातून पाणी पुरवठा होतो. लोकसंख्या वाढल्यामुळे नगरपालिकेला रोज पुरवठा योजनेतून पाणी सोडता येत नाही. हे पाणी दिवसाआड सोडले जात आहे. तपाण्याचे शुद्धीकरण करून जार भरले जातात. अशा जारच्या पाण्यावर इंदापूर शहरवासीयांचा विश्वास आहे. इंदापूर तालुक्यासह सोलापूर व पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांना पाणीपुरवठा हा प्रामुख्याने उजनी धरणाच्या जलाशयातून होतो. हा पाणीपुरवठा इंदापूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी उजनी धरणातून होत आहे. मध्यंतरी उजनीचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सोडले गेले. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. गढूळ पाणी पिण्यासाठी शहरवासी कंटाळलेले आहेत. त्यामुळे घरटी जारचे पाणी वापरत आहेत.
इंदापूर शहराच्या नजिकच्या गावात शहा भागात शुद्ध पाण्यासाठी जारचा धंदा तेजीत आला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने याच शुद्ध पाण्याला मोठी मागणी आली आहे. प्रत्येक विक्रेत्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक घरटी असल्यामुळे पाणी संपताच फोन करून नवीन जार मागवले जातात. शहराची लोकसंख्या 30 हजारांच्या आसपास आहे. शहरात 19 वार्ड असल्यामुळे तहान नगरपरिषदेच्या पाण्याने तहान भागत नाही.
इंदापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तलाव अस्तित्वात होते. यामध्ये कोकतळे, भार्गवराम तलाव, जावडेकर तलाव हे प्रमुख तीनही तळ्यातले पाणी आता शहरवासीयांना कधीच मिळत नाही. त्यामुळे शहरामध्ये नैसर्गिक पाण्याचा साठा कायमचा बंद झाला आहे. प्रसिद्ध कोकतळे जागेवर तळ्यामध्ये गुंठेवारी करून जागा विकून घरे बांधण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. भार्गवराम तलावामधील बागीचा फुलला नाही. जावडेकर तलावात प्रचंड मातीचे गाळ साचल्यामुळे पाणीसाठा होत नाही. पाण्याचे साठे शहरातील संपुष्टात आले आहेत. तलाव पाण्याविना कोरडे पडले आहेत.
जुनी पाणी योजना कालबाह्य
इंदापूर शहरात 1972 दुष्काळात देखील पाणीटंचाई भासली नव्हती. त्यावेळी शहरातून पाणी लगतच्या गावांमध्ये पुरवले जात होते, असा इतिहास शहराच्या पाणीपुरवठ्याचा होता, आता फक्त नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर विसंबून आहे. जुनी नळ पाणीपुरवठा कालबाह्य झाली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम कागदोपत्री पूर्ण दाखवले आहे. मात्र, हे काम रखडले आहे. अनेक ठिकाणी कामाचा दर्जा नाही. पाणी सोडले की पाईप आजही फुटत आहे. त्यामुळे शहरात पाण्याचे हाल अद्याप सुरूच आहेत. 1985 पर्यंत इंदापूर शहर हे दीडशे एकर क्षेत्रावर वसलेले होते. या शहराला कधीही पाण्याचा तुटवडा आला नाही. परंतु इंदापूर नगर परिषदेच्या माध्यमातून फक्त वर्षातून सहा महिने पाणी मिळते आहे. तेही दिवसाआड मिळत आहे. अनियमितपणे पाणी मिळत आहे. त्यामुळे जारच्या पाण्यावर शहरवासियांना विसंबून राहावे लागत आहे. नगरपालिका पाणीपट्टीसाठी तगादा लावत आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून 35 कोटह रुपयांच्या पाणी योजनेचे काम सुरूच आहे. त्यामुळे इंदापूरकरांना दरवर्षी पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे.