इंदापूर वनविभागाची भिगवण परिसरात धडक कारवाई
कोट्यवधींचे इमले कोणाच्या आशीर्वादावर?
वन विभागाने केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत करण्यात येत असले तरी ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी वन विभाग कारवाई करताना दुटप्पीपणा करत असल्याचे म्हणत आहेत. वन विभागाच्या जागेत असणारे कोट्यवधी रुपयांचे बंगले वनविभागाच्या आशीर्वादाने उभे असल्याचीही चर्चा होत आहे.
भिगवण – भिगवण परिसरारील कुंभारगाव, भादलवाडी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहिम या आठवड्यात वनविभागाच्या वतीने दोन दिवस राबविली. कारवाईत पन्नास हेक्टर क्षेत्रावरील वनजमीन मोकळी करण्यात आली. दीड वर्षांपासून तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा धडाका वनविभागाने चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये ऊस, डाळिंब, मका, कडवळ,फळबागा आदी पिके जमीनदोस्त केली. 40 जणांवर वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, संजय मारणे, इंदापूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी राहूल काळे, भिगवण वन क्षेत्रपाल पवन आहेर, बारामतीचे गौरीशंकर सुपेकर, दौंडचे महादेव हजारे, पौडचे पोपट कापसे, अंकिता तरडे( ताम्हिणी) तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी, वनरक्षक व वनमजूर, राज्यराखीव पोलीस दल मुंबई तुकडी आदी दीडशे जणांच्या पथकासह 8 ट्रॅक्टर, 20 जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील पिके जमिनदोस्त केली. कुंभारगावमध्ये वनजमिनीच्या हद्दीत पर्यटकांचे निवासस्थान सील बंद करण्यात आले.
वनक्षेत्रात सुरू करण्यात आलेला बर्फाचा कारखाना सील करण्यात आला. मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वनजमिनीचे सर्व्हेक्षण करुन हद्दी निश्चित केल्यानंतर अतिक्रमण काढले जात आहेत. आतापर्यंत 18 गावांमध्ये 625 एकर क्षेत्रावरील शेत जमिनींवरील अतिक्रमण हटविले आहेत. शेतकऱ्यांनी वनविभागाच्या जमिनीत अनेक ठिकाणी कब्जा केला आहे. त्यामधील अतिक्रमणे काढावीत, असे वनविभागाने आवाहन केले आहे. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील 83 एकर तर भादलवाडी येथील 42 एकर क्षेत्रावरील शेतीचे अतिक्रमण, घर, गोठे, कांदा चाळी, फळबागा, नगदी पिके यांचे बेकायदेशीररित्या अतिक्रमण काढली. दरम्यान, वनविभागाने केलेल्या धडक कारवाईने जीवापाड जपलेली पिके मातीमोल झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसून आले.
वनविभागाची कारवाई ही वनकायद्यानुसार करण्यात आली आहे. वन कायद्याचा भंग झाल्यास शिक्षा व दंड करण्याची वन कायद्यात तरतूद आहे. अतिक्रमणे काढून आगामी काळात त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा मानस आहे. यापुढेही अतिक्रमण करण्याविरोधात धडक कारवाई सुरू राहणार आहे.
– राहुल काळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, इंदापूर.