पुणे – भूमी अभिलेख विभागाच्या वतीने तलाठी या पदाच्या 4 हजार 466 जागांसाठी तब्बल 11 लाख 10 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार तलाठी परीक्षा ही तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. गुरुवारपासून (दि.17) पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. आज 45 हजार 378 उमेदवारांपैकी 34 हजार 153 उमेदवारांनी परीक्षा दिली. यामध्ये 11 हजार 225 इतके विद्यार्थी अनुपस्थित होते.
भूमि अभिलेख विभागाच्या वतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा दि.17 ऑगस्ट ते दि.14 सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेतली जात आहे. पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान 10 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जात आहे. तर परीक्षेचे पत्र आणि केंद्र तीन दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही परीक्षा दिवसभरात तीन सत्रात घेण्यात येत आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आली.
या पदासाठी राज्यभरातून विक्रमी अर्ज आल्यामुळे तीन सत्रात ही परीक्षा घेण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी 9:30 ते 11, दुपारी 13:30 ते 2:30 आणि सायंकाळी 4:30 ते 6:30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी तीनही सत्रासाठी प्रत्येकी 15 हजार 125 उमेदवारांना परीक्षा देण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या संख्येपेक्षा अतिशय कमी विद्यार्थी उपस्थित राहिले असल्याचे दिसून आले. तीनही सत्रात मिळून 34 हजार 153 एवढेच विद्यार्थी परीक्षेस बसले होते, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अप्पर आयुक्त तथा परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.