मेक्सिको : भारतातून बेकायदा स्थलांतरीत झालेल्या 311 जणांच्या गटाला परत पाठवण्यात आले. अमेरिकेत जाण्यासाठी मेक्सिकोच्या भूमीचा वापर करणाऱ्यांवरील ही अशा स्वरूपाची पहिलीच कारवाई आहे. मेक्सिको स्थलांतर राष्ट्रीय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विविध वयोगटातील 310 पुरूष आणि एक महिला यांना नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानाने बुधवारी रात्री पाठवून देण्यात आले आहे.
हे विमान नवी दिल्लीत शुक्रवारी सकाळी पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय आणि मेक्सिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 311 भारतीयांना घेऊन मेक्सिकोहून विमान रवाना झाल्याचे आम्हाला माहित आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परस्परांशी संपर्क ठेवून आहे. त्यांच्या सुखरूप परतीसाठी भारतातील मेक्सिकन दुतावास प्रयत्नशील आहे. विमानाने एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी पाठवण्याची ही पहिलीच घटना आहे.
मेक्सिकोत राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसणाऱ्या भारतीय नागरिकांच्या ओळखपत्रांची तपसणी करून, भारतीय प्रशासनाकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून त्याची पडताळणी करून ही परत पाठवणीची प्रक्रिया करण्यात आली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या परत पाठवणीच्या कार्यात भारतीय प्रशासनाशी उत्तम समन्वय होता. ओक्साका, बाजा कॅलिफोर्निया, वेराक्रुझ, चियापास, सोनोरा, मेक्सिको चिटी, डुरांगो आणि टबॅस्को या शहरातून या नागरिकांना ताब्यात घेतले.