नवी दिल्ली: प्रत्यक्ष ताबारेषेवर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने 20 हजार पेक्षा अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तर शिनजीआंग भागात याशिवाय अतिरिक्त 10 ते 12 हजार सैन्य तैनात केले आहे. या सैन्याजवळ वाहनांचा ताफाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना त्याच्या पाठीमागे शस्त्रसाठाही तैनात करण्यात आला आहे. तो 48 तासांत भारतीय सीमेजवळ पोहोचू शकतो.
चीनच्या लष्कराने पूर्व लडाख क्षेत्रात प्रत्यक्ष ताबा रेषेवर दोन डिव्हिजन सैन्य तैनात केले आहे. तर उत्तर शिनजिआंग प्रांतात दहा हजार सैनिकांची एक डिव्हीजन तैनात केली आहे. हे पथक सीमेपासून सुमारे एक हजार किमीवर तैनात केली आहे. मात्र हे सैन्य 46 तासांत सीमेवर पोहोचू शकते अशी माहिती सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
भारतीय सीमेशेजारी होणाऱ्या चीनी सैन्याच्या हालचालीकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत, असेही सूत्रांनी सांगितले. गेले सहा आठवडे भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवरील वरीष्ठांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र या काळात चीनी सैन्याने एकही जवान सीमेवरून कमी केलेला नाही.
चीन सामान्यत: तिबेटच्या भागात दोन डिव्हीजन सैन्य तैनात करत असते. मात्र यावेळी त्यांनी दोन हजार किमीवरून चीनच्या मुख्य भागातून आणखी दोन डिव्हीजन सैन्य तैनात केले आहे.
भारतानेही जवळपासच्या भागातून पूर्व लडाख क्षेत्रात दोन डिव्हीजन सैन्य तैनात केले आहे. दरवर्षी पर्व लडाख क्षेत्रात तैनात कराव्या लागणाऱ्या राखीव लष्करी दलाला तैनात करण्यात आले आहे.
रणगाडे आणि आणि बीएमपी 2 ही सीमावर्ती भागातील लढाऊ वाहनेही तैनात करण्यात आली आहेत. भारतीय हवाई दलाच्या मदतीने ही सशस्त्र सेना सीमेजवळ हलवण्यात आली आहे, डीबीओ क्षेत्रात चीनी फौजांचा आक्रमकपणा पाहता या क्षेत्रात आणखी सैन्य तैनात करण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे, असेही सरकारी सूत्रांनी सांगितले.