इस्लामाबाद: दहशतवादाचे आश्रयस्थान असणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी संसदेत कराची हल्ल्यावरून मोठाच थयथयाट केला. त्या हल्ल्यामागे भारत असल्याचा कांगावा त्यांनी केला.
पाकिस्तानी स्टॉक एक्स्चेंजच्या कराचीमधील इमारतीवर सोमवारी दहशतवादी हलृा झाला. त्या हल्ल्याचा मुद्दा इम्रान यांनी पाकिस्तानी संसदेत उपस्थित केला. हल्ल्यामागे भारतच असल्याबाबत कुठली शंका नाही, असे त्यांनी म्हटले.
हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी भारतावर ठपका ठेवला होता. त्यावर भारताने संतप्त प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले होते. त्यानंतरही इम्रान यांनी भारतविरोधी गरळ ओकली. पाकिस्तानात दहशतवाद्यांना सुरक्षितपणे आश्रय मिळत असल्याचे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. तरीही भारतविरोधी आकांडतांडव करून पाकिस्तान स्वत:चेच हसे करून घेत आहे.
दरम्यान, कराची हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेने स्वीकारली आहे. ती संघटना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सक्रिय आहे. बीएलएला पाकिस्तानपासून बलुचिस्तान वेगळे हवे आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारची नेहमीच त्या संघटनेवर वक्रदृष्टी असते.
आता हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतानाच त्या संघटनेने भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आणि चीनला लक्ष्य करण्यासाठी हल्ला घडवल्याचे बीएलएने म्हटले आहे. बलुचिस्तानमधील चीनची लुडबूड मान्य नसल्याचे बीएलएचे म्हणणे आहे.