सातारा – जिल्ह्याने निर्मल ग्राम अभियान, हागणदारीमुक्त ग्राम अभियानात देशभरात नावलौकिक मिळवला आहे. हागणदारीमुक्तीसह सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त प्लस (ओडीएफ प्लस) होणार आहेत. दि. 2 ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभांमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन 2 ची अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छतेच्या सर्व शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन गावे हागणदारीमुक्त प्लस (ओडीएफ प्लस) करण्यात येत आहेत. वैयक्तिक, सार्वजनिक, शाळा, अंगणवाडी व सर्व कार्यालयांमध्ये शौचालय बांधकाम व वापर, शाश्वत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, नियमित गावे स्वच्छ या सुविधा ग्रामपंचायतींच्या हद्दीत पुरवायच्या आहेत. या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी विभागाने केलेल्या कामामुळे जिल्हा परिषदेच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
चिंचणी पुनर्वसन, निगडी वंदन, चिंचणेर वंदन (ता. सातारा) , जांब खुर्द, भोसे (ता. कोरेगाव), पांढरवाडी, जांब, त्रिमली (ता. खटाव), खंडाळ्याचीवाडी, गरडाचीवाडी, उगलेवाडी (ता. माण), झगलवाडी, घाडगेवाडी (ता. खंडाळा), सरताळे, वालुथ (ता. जावळी), क्षेत्र महाबळेश्वर, भोसे (ता. महाबळेश्वर), पाडळी हेळगाव, चोरजवाडी, साबळवाडी (ता. कराड), येराड, कौंदळ पुनर्वसित, दिवशी खुर्द, कवरवाडी, राहुडे (ता. पाटण), अनपटवाडी, बोरगाव (ता. वाई), सोनगाव, कोरेगाव (ता. फलटण) ही 29 गावे ओडीएफ प्लस घोषित झाली आहेत. दि. 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी सांगितले.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह हागणदारीमुक्त ग्रामपंचायती करुन सातारा जिल्हा परिषदेने देशात नावलौकिक मिळवला आहे. सातारा जिल्हा महाराष्ट्रात पहिला ओडीएफ प्लस जिल्हा होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा.
विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी