पुणे, दि. 29 -माझ्यासोबत जुनी माणसे आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही लोक “ढळली’ पण खरी “अढळ’ लोक माझ्यासोबत कायम आहेत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील नेते तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता आढळराव पाटील नेमके काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पक्ष चिन्हाच्या दिलेल्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा भाष्य केले आहे. शिरूर मतदारसंघातील शिवसैनिकांनी गुरुवारी (दि. 29) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीच्या आवारात या सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, दसऱ्याला काहीच दिवस शिल्लक असून, येताना शिस्तीने या. विरोधक शिवसैनिकांकडून काहीतरी चुकीचे करून घेण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही सावध राहा, आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती न्यायालयातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो. शिवसेना जनतेच्या मनाला महत्त्व देते ती लढाई आपण केव्हाच जिंकली असल्याचे सांगत ती लोकांच्या मनात तशीच राहू द्या, असे ते म्हणाले.
शिरूरच्या राजकारणात गद्दार नकोत
नाव एक आणि करायचे दुसरेच, असा हा प्रकार झाला. शिरुर मतदारसंघात शिवनेरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावाला बट्टा लागणे हा शिवसेनेचा अपमान आहे. त्यामुळे यापुढे शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार माणसे आढळता कामा नये, असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले.
बड्या नेत्याची घरवापसी ठरणार ट्रम्पकार्ड
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हादरे बसले आहेत. त्यानंतर ठाकरे यांनी जुन्या नेत्यांना पुन्हा साद घालण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले जुन्नर तालुक्यातील बाळासाहेब दांगट हे पक्षातील कुरघोड्यांना कंटाळून राजकारणापासून दूर गेले होते; मात्र ते कॉंग्रेसमध्ये ते फारसे सक्रिय नव्हते. दरम्यान, मध्यंतरी बाळासाहेब आणि बाजीराव दांगट हे दोन्ही बंधू “मातोश्री’वर गेले होते. त्यावेळीच त्यांनी शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी गुरुवारी हातात शिवबंधन बांधले. दरम्यान, आढळराव पाटील यांना धक्का देण्यासाठी बड्या नेत्याच्या घरवापसीने जुन्नरमधील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मी टीका टिप्पणी करणार नाही. पण महाविकास आघाडीत आपण मुख्यमंत्री असताना, शिरूर लोकसभा मतदारसंघातील आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अन्याय अत्याचार होत होते. राष्ट्रवादीच्या अन्याय अत्याचारामुळे आम्हाला जगू द्या, अशी म्हणण्याची वेळ तुम्ही मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर आली होती. या अन्याय अत्याचारांची दखल आपण वेळीच घ्यायला हवी होती.
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार