नवी दिल्ली : देशात एकाच दिवसांत 27 हजार 114 बाधित सापडण्याचा उच्चांक शुक्रवारी नोंदवण्यात आला. त्यामुळे बाधितांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर 22 हजारांपेक्षा अधिक बाधित सापडण्याचा हा सलग आठवा दिवस आहे.
केंद्र सरकारने सकाळी आठ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार 22 हजार 123 बाधितांची 24 तासांत भर पडली. तर 519 जणांनी आपले प्राण गमावले. बाधितांची एकूण संख्या आठ लाख 20 हजार 916 वर जाऊन पोहोचली. त्यात दोन लाख 83 हजार सक्रिय बाधित आहेत. तर पाच लाख 15 हजार 385 जण बरे झालेले आहेत. या बाधितांमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण 62. 87 टक्के इतके आहे.
देशात 519 जणांचे बळी करोनामुळे 24 तासांत गेले. त्यात महाराष्ट्रातील 216, तामिळनाडूतील 64, कर्नाटकातील 57, दिल्लीतील 42, उत्तर प्रदेशातील 27 आणि प. बंगालमधील 26 जणांचा समावेश आहे.