पुणे – खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले होते. या आवाहनाला काही कंपन्यांनी प्रतिसाद देत, तालुक्यातील काही गावांना पाणी साठवणुकीसाठी टाक्यांचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत जुन्नर, दौंड, खेड आणि शिरूर तालुक्यांत एकूण 262 पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून पाण्याचे स्त्रोतही संपत चालले आहेत. अशा परिस्थितीत 12 तालुक्यांतील 130 गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये बहुतांशवेळा टॅंकरचे पाणी विहिरीत किंवा टाकीमध्ये साठविले जाते. मात्र, उन्हाळामुळे या पाण्याचा साठा कमी होत आहे. त्यामुळे पाणी विहिरीत न टाकता टाक्यांमध्ये टाकले तर पाण्याची बचत होईल, असे मत काही सदस्यांनी सर्वसाधारण सभेत मांडले. त्यावेळी सीएसआरच्या माध्यमातून गावांना पाण्याच्या टाक्या देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्याकडून सांगण्यात आले.
त्यानुसार अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी वारंवार पाठपुरावा करून कंपन्यांना आवाहन करून टाक्या मागविण्यात आल्या. त्यामुळे आता टॅंकरमधील पाणी विहिरीत अथवा हौदामध्ये न टाकता टाक्यांमध्ये भरण्यात येत आहे. एक टाकी साधारण 3 ते 5 हजार लीटरची आहे. त्यामुळे गावात टॅंकर गेल्यानंतर वस्तीवर किंवा गावामध्ये ठेवलेल्या टाकीमध्ये पाणी सोडले जाते. त्यानंतर टाकीमधून नागरिकांना पाणी घेण्याची सुविधा केली आहे. दरम्यान, अधिकाधिक मदत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी कंपन्यांशी संपर्कात असून दुष्काळावर मात करण्यासाठी कंपन्यांकडे असलेल्या सीएसआरची मदत घेतली जात आहे.