मावळ – थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पुणे परिमंडलातील 95 हजार 127 थकबाकीदार ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून शुकवारपर्यंत (दि. 24) पर्यंत अंधारातच आहेत. यामध्ये सर्वाधिक 76 हजार 13 घरगुती ग्राहकांचा समावेश आहे. मावळ, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, खेड तालुक्यात 24.94 कोटींची थकबाकीदार आहेत. ग्रामीण भागात 26 हजार 852 ग्राहक अंधारात आहेत.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे “वर्क फ्रॉम होम’द्वारे नोकरी करणाऱ्या ग्राहकांमुळे, भाडेकरू नसल्याने बंद घर किंवा अन्य कारणांमुळे वीजवापर नसल्याने अनेक घरगुती ग्राहकांनी थकबाकी भरली नसल्याचे “महावितरण’च्या पडताळणीमध्ये दिसून येत आहे.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर घरात कोणी राहत नाही किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे वीजवापर नसला तरी बिलांची थकबाकी ठेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ग्राहकांनी कोणत्याही ठिकाणाहून “ऑनलाइन”द्वारे थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यास वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.
मात्र कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सहा महिन्यांमध्ये व्याज, दंड आणि संपूर्ण थकबाकी न भरल्यास नंतर नवीन वीजजोडणी घ्यावी लागणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी वीजवापर नसल्यास किंवा घर बंद असले सध्याची थकबाकी व पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणकडून सध्या शून्य ते 30 युनिट वीजवापर होणाऱ्या वीजजोडण्यांची तपासणी वेगाने सुरू आहे.
तसेच वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्यांच्या पर्यवेक्षणासाठी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसा व सायंकाळनंतर विशेष तपासणी सुरू आहे. या दोन्ही मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही आजूबाजूच्या ठिकाणाहून केबलद्वारे अनधिकृत वीजवापर आढळल्यास केल्यास नियमाप्रमाणे कलम 126, 135 किंवा 138 नुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच शहराबाहेरून “वर्क फ्रॉम होम’मुळे घर बंद असणे, भाडेकरू नसल्याने घर बंद किंवा इतर कारणांमुळे वीजवापर नसल्याने थकबाकी भरलेली नसल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत घरगुती वर्गवारीमध्ये (कंसात थकबाकी) हवेली ग्रामीणसह मुळशी, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, खेड व मावळ तालुक्यामधील 26 हजार 852 ग्राहकांचा (24.94 कोटी) वीजपुरवठा खंडित आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकीमुळे खंडित आहे. घरगुतीसह या सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत वीजबिल व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.