नवी दिल्ली – भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्लेखोरांना भारतातच कंठस्नान घालण्यात आले. मात्र ज्यांनी या हल्ल्याचा कट आखला व त्यावर देखरेख ठेवली त्यांनाही न्यायालयासमोर आणले गेले पाहिजे अशी मागणी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केली आहे. जयशंकर यांनी या हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओ जारी केल्यानंतर ही मागणी केली.
संबंधित व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला कल्पना आहे की हल्ल्याची एक घटनाही मोठी असते. त्यात मरण पावलेली एक व्यक्तीही मोठी संख्या असते. त्यामुळे दहशतवादाला समुळ नष्ट केल्याखेरीज आम्ही शांत बसणार नाही. मोदींचा हा व्हिडिओ संदेश जारी करून जयशंकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाचे एक जबाबदार घटक म्हणून ही आपली जबाबदारी आहे की हल्ल्याच्या या आघाताचे आपल्याला विस्मरण होता कामा नये आणि दहशतवाद्यांना शिक्षा देण्याबाबत आपली कटीबध्दता कायम राहीली पाहिजे.
दरम्यान, दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एक गंभीर धोका असल्याचे भारताच्या संयुक्त राष्टांतील कायम प्रतिनिधी रूचिरा कंभोज यांनी म्हटले आहे. इसिस आणि अल कायदाशी संबंधित समूह व त्यांच्यापासून प्रेरीत झालेल्या दहशतवादी संघटना विशेष करून आशिया आणि आफ्रिका खंडात सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे काम करत आहेत. मुंबईवर 26/11 रोजी हल्ला करणारे 10 दहशतवादी समुद्र मार्गे पाकिस्तानातून मुंबईत आले होते हे विसरता येणार नाही. त्यांनी 26 विदेशी नागरिकांसह 166 जणांची हत्या केली होती याचे स्मरण त्यांनी करून दिले.