नवी दिल्ली – भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटावर भाष्य केले आहे. पाकिस्तानचे भवितव्य मुख्यत्वे त्याच्या स्वत:च्या कृती आणि निवडींवर ठरते, आर्थिक संकटातून कसे बाहेर पडायचे हे पाकिस्तानवर अवलंबून आहे, असे जयशंकर यांनी म्हंटले आहे.
भारताने श्रीलंकेला दिलेल्या मदतीचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, गंभीर आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला मदत केली. पण भारत आणि श्रीलंकेचे संबंध पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.
परकीय चलनाचा घटता साठा, उच्च चलनवाढीचा दर आणि पाकिस्तानी चलनात मोठी घसरण यामुळे पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यावर मात करण्यासाठी, पाकिस्तान आयएमएफकडून बेलआउट पॅकेज मिळविण्यासाठी उच्च कर दर लागू करण्यास तयार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, “कोणीही अचानक आणि विनाकारण कठीण परिस्थितीत सापडत नाही. आज भारताचे पाकिस्तानशी असे संबंध नाहीत की त्यांना मदत करता येईल. परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग शोधणे हे आपल्या शेजारील देशावर अवलंबून आहे.
मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी भारतीय लोकांच्या श्रीलंका आणि पाकिस्तानबद्दलच्या भावनांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, पाकिस्तान भारतात सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे. भारत आपल्या शेजाऱ्यांना कठीण परिस्थितीत मदत करण्यास सदैव तयार आहे. श्रीलंकेचे उदाहरण देताना ते म्हणाले की जर मी श्रीलंकेशी तुलना केली तर ते खूप वेगळे नाते आहे. श्रीलंकेबद्दल भारतात अजूनही खूप सहानुभूती आहे.
शेजारी देशांची चिंता ही भारताची चिंता असणे स्वाभाविक आहे आणि आपण त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जाण्यास मदत केली पाहिजे. पण, पाकिस्तानबाबत देशातील जनतेच्या भावना काय आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे मदत करणे शक्य होत नाही.
दरम्यान, गंभीर आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भारताने गेल्या वर्षी श्रीलंकेला 4.5 अब्ज डाॅलरची मदत दिली होती. याशिवाय भारताने गेल्या महिन्यात श्रीलंकेच्या कर्ज पुनर्गठन कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाठिंबा देण्याचे पत्रही दिले आहे. श्रीलंकेसाठी आयएमएफला समर्थन पत्र देणारा भारत हा पहिला देश आहे.
दरम्यान, कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली आहे. सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा परकीय चलन साठा 3 अब्ज डॉलरपेक्षा कमी राहिला आहे. ही रक्कम केवळ 15 दिवसांच्या आयातीसाठी पुरेशी आहे.
आयएमएफच्या अहवालानुसार, पाकिस्तानवर 126 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. त्यापैकी सर्वाधिक कर्ज हे चीनचे सुमारे 30 अब्ज अमेरिकी डॉलर आहे.