सातारा संतोष पवार (प्रतिनिधी ) – जिल्ह्यात दोन हजार 732 प्राथमिक शाळा असून, त्यापैकी 229 शाळा अवघड (दुर्गम) क्षेत्रात आहेत. सात निकषांपैकी चार किंवा चारपेक्षा जास्त निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची यादी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रसिद्ध केली आहे. पाटण तालुक्यात सर्वाधिक 122 व महाबळेश्वर तालुक्यात 71 शाळा अवघड क्षेत्रात आहेत. कोरेगाव, खटाव, फलटण, माण या तालुक्यांमधील एकही शाळा अवघड क्षेत्रात नाही.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यासाठी दुर्गम व सुगम क्षेत्रातील शाळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. अवघड क्षेत्रासाठी सातपैकी चार किंवा चारपेक्षा अधिक निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रातील म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. नक्षलग्रस्त/पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव, वार्षिक पर्जन्यमान दोन हजार मिमीपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव, हिंस्र वन्यप्राण्यांचा उपद्रव असलेला जंगलव्याप्त प्रदेश, वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असलेले गाव,वाहतूकयोग्य रस्त्यांचा अभाव/रस्त्याने न जोडलेल्या शाळा, संवादछायेचा प्रदेश, डोंगरी भाग, राष्ट्रीय वा राज्य महामार्गापासून दहा किमीपेक्षा दूर, या निकषांपैकी चार निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पाटण तालुक्यातील सर्वाधिक 122, महाबळेश्वर तालुक्यातील 71, जावळी तालुक्यातील 18, कराड तालुक्यातील दोन, सातारा तालुक्यातील दहा, वाई तालुक्यातील सहा प्राथमिक शाळा अवघड क्षेत्रात आहेत. यापूर्वी अवघड क्षेत्रात असलेल्या शाळा आता सुधारित अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीतून वगळण्यात आल्या असल्या, तरी तेथे सुधारणेपूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सेवा केली आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून केवळ 2022-23 च्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमधील सेवा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
यावर हरकती 2 एप्रिलपर्यंत संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करायच्या आहेत. प्राप्त हरकतींची विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी छाननी करुन, शिफारशी व अभिप्रायांसह 4 एप्रिलपर्यंत जिल्हा परिषद आस्थापना 2 कार्यासनाकडे समक्ष सादर कराव्यात, अशा सूचना विनय गौडा यांनी केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी सातपैकी तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रात येत होत्या.यावर्षी चार निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रात आल्याने, अनेक दुर्गम शाळा सुगम झाल्या आहेत. याबाबत किती हरकती दाखल होणार, हे 2 एप्रिलला समजणार आहे. चार निकषांच्या निर्णयावर शिक्षक संघटना काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे.