राहाता – राहाता तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या धुक्याने द्राक्ष फळबागांसह कांदा, ज्वारी या पिकांना फटका बसत आहे. यंदा मुबल पाणी असतानाही या धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राहाता शहरासह तालुक्यात जवळपास सर्वत्रच दोन दिवसांपासून पहाटेपासून धुके पडत आहे. आज सकाळी सात वाजता पडलेली धुक्याची चादर सकाळी दहा वाजेपर्यंत होती. या धुक्यामुळे वातावरणात ओलसरपणा होता. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, द्राक्षबागांवर रोग पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच कांदा व ज्वारी पिकाचेही मोठे नुकसान होणार असून, हरभरा पिकावर आळी रोग पडला, तर गव्हाच्या पिकावर मावा रोग पडण्याची शक्यता आहे. या रोगराई परिस्थितीमुळे शेतकरी हतबल हा झाला असून, आता या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागत आहेत.
शहर व परिसरात सूर्याचे दर्शन नसल्याने तसेच अचानक हवेत गारठा वाढल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. काही जाणकार शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.धुक्यामुळे पीक नुकसानीस समोर जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
धुक्यामुळे कांदा पिकावर करपा रोग, तर द्राक्षावर कोच निर्माण होऊन घडांची वाढ कमी होणार आहे. द्राक्षांना दावणी, बुरी या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. असेच जर वातावरण राहिले, तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्कोर, कवच, फॉलिकूर, कॅबरीओ टॉप, नेटिव्ह ही औषध फवारावीत. किंवा दोन्ही पिकांवर बुरशीनाशक फवारणी करावी. द्राक्षावर दिवसातून दोनदा, तर कांदा पिकावर सात दिवसांच्या अंतरावर बुरशीनाशके फवारावीत.
संदीप गायकवाड कृषी सहायक