कोपरगाव – भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्याने तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल 22 महिलांना विषबाधा झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील दुकानदारांनी दुकानातील भगरीचे पिठ गायब करुन याच्याशी काही संबंध नाही, या अविर्भावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की, भगरीच्या पिठापासुन तयार केलेल्या भाकरी खाल्याने अनेक महिलांना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी येथे आणण्यात आले होते. बाधितांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या जुलाब होणे, असा शारिरीक त्रास जाणवत होता. या विषबाधितांवर तातडीने योग्य उपचार केल्यामुळे अनेकांची प्रकृती स्थिर झाली आहे.
नागरीकांनी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने तसेच कालबाह्य झालेल्या भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्या किंवा शिळ्या, अर्धवट भाजलेल्या भाकरी खाल्याने विषबाधा झाली असावी तेव्हा दुषित भगरीच्या पिठाचे पदार्थ खाऊ नये तसेच दुकानदारांनी दुषित भगरीचे पिठ नागरीकांना देवू नये, असे आवाहन डॉ.यादव यांनी केले.
तालुक्यातील वारी येथील 7 जणांना तर तळेगाव मळे येथील 6 जणांना भगरीच्या भाकरी खाल्याने विषबाधा झाली. बाधित व्यक्तींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार केल्याने रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी दिले.
भगरीच्या पिठाच्या भाकरीमुळे त्रास
<उपवासाच्या काळात भगरीच्या पीठाच्या भाकरी खाल्ल्या जातात, मात्र भगरीचे पिठ तयार करताना भगरीला अगोदर व्यवस्थित भाजुन घेवून दळावे लागते, परंतु काही व्यापारी नफेखोरीच्या नादात योग्य पद्धतीने पिठ तयार केले जात नाहीत. काही उत्पादक जुन्या भगरीच्या तुकड्यापासुन पिठ तयार करुन बाजारपेठेत पुरवठा करतात. भगर खाल्याने कोणालाही विषबाधा झाली नाही, पण भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्याने नागरीकांना त्रास झाला अशी खंत कोपरगाव व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा यांनी व्यक्त केली.