शंकर दुपारगुडे
कोपरगाव – कोपरगावची बाजारपेठ असून नसल्यासारखी. काही ठराविक व्यापारी व काळे- कोल्हे यांच्या ताब्यातील दोन सहकारी साखर कारखान्याच्या जोरावर कशीबशी बाजारपेठ तग धरून आहे. सणासुदीला बाजारपेठेत गर्दी दिसते. अन्यथा मुख्य बाजारपेठेतील व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिवसभर दुकानातील धुळ झटकत बसतात. गुंतवणुकीच्या व दैनंदिन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने अनेक बड्या व्यापाऱ्यांनी कोपरगाव शहराकडे पाठ फिरवली. शहरातील काही नामवंत व्यवसायिकांनी शेजारच्या मोठ्या शहरात जावून दुकाने थाटली. कोपरगाव शहरातील बहुतांश नागरीकांनी येथील वातावरणाला कंटाळून स्थलांतरीत होत आहे. अशी अवस्था असतांना नगरपालिकेनेमध्ये घरपट्टीत अव्वाच्या सव्वा वाढ करून बाजारपेठचा उगिचच भाव वाढविला आहे.
शहराचा 80 टक्के भाग पुररेषेत असल्याने त्या भागाचा विकास करणे किंवा त्या जागेत इमारती बांधता येत नाहीत. बांधल्या तरी त्यांना शासकीय नियमाप्रमाणे अपेक्षित मुल्य मिळत नाही. कोपरगाव शहरातील मालमत्तेला दैनंदिन व्यवहारात इतर शहरांच्या तुलनेत अतिशय कमी मुल्य आहे. इतर जिल्ह्यांसह तालुक्यातील खेडेगावच्या बाजारपेठेचे मुल्य वाढले पण कोपरगाव शहराचे मुल्य कमी झाले. इतकी भयानक अवस्था शहरातील मालमत्ताधारकांची असताना नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातुन नागपुरच्या आर. एस. कंट्रक्शन्स या कंपनीने शहरातील मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून अचानक मालमत्तेचे मुल्यांकन वाढविल्याने नागरीकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अतिक्रमण जागेत कच्चे बांधकाम असलेल्या पत्र्याच्या खोलीचे मुल्य लाखात केले.
मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे मुल्य अर्थात बाजारभाव वाढवून दाखविल्याने कधी नव्हे ती कोपरगावची बाजारपेठ जिल्ह्यात नंबर वन असल्याचे पालिकेने सिध्द केले. इतकेच नाही तर पालिकेने आगामी घरपट्टी भाडे मुल्यावरून थेट भांडवली मुल्यावर आकारणी केल्याने डबघाईत असलेल्या बाजारपेठेतील व्यवसायिकांची घरपट्टी अव्वाच्या सव्वा वाढली. सणासुदीच्या तोंडावर जिल्ह्यातील एकमेव कोपरगाव पालिका आहे की,सर्वात जास्त घरपट्टी वसुल करण्याच्या तयारीत आहे. ज्या शहराचे भांडवली मुल्य विक्रमी आहे. त्या शहरातील नागरीकांना संबंधित नगरपालिका भाडे मुल्यावर कर आकारणी करते. शिवाय 20 टक्क्याच्या पुढे जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेने करवाढ केली नाही. कोपरगाव नगरपालिका डबघाईत आहे.बाजारपेठ सलाईनवर आहे. येथील भांडवलदार डबघाईला वैतागून गाव सोडून चालले.
अशा अवस्थेतील पालिकेने नागरीकांना थेट वाढीव भांडवली मुल्यावर कर लादण्याचा नियम करुन नागरीकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार केल्याने या वाढीव करवाढीच्या विरोधात नागरीकामधुन संताप व्यक्त होतोय. मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे गुणांकन तपासण्याबरोबर मालमत्तेचे मोजमाप करुन योग्य तो अहवाल सादर करण्याचे काम आर. एस. कंट्रक्शन्स या कंपनीला दिले होते.जितक्या मालमत्तांचे सर्वेक्षण अहवाल दिले जातील, तितकच पैसे देणार असल्याने संबंधित कंपनीने अनेक ठिकाणी चुकीचा सर्वे करुन मालमत्ताधारक व त्यांच्या मालमत्ते मुल्य वाढवून पालिकेकडून वाढीव पैसे लाटण्याच्या नादात संपूर्ण कोपरगाव पालिकेच्या हद्दीतील नागरीकांचा चुकीचा अहवाल देत कराच्या रूपाने त्यांची फसवून केली. दरम्यान, संबंधित कंपनीने चुकीचा अहवाल सादर केल्याचे कोणाच्याही लक्षात कसे आले नाही.
गेल्या दिड वर्षापासून संबंधित कंपनी नागरीकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करताना चुकीचे करत आहे. नागरीकांच्या आर्थिक विषयाचे हे काम करीत असताना तत्कालीन मुख्याधिकारी, विद्यमान मुख्याधिकारी,नगराध्यक्ष, नगरसेवक, पालिकेचे संबंधित कर्मचारी, सुज्ञ समाजसेवक दक्ष नागरीक यांच्यापैकी कोणाच्याही लक्षात कसे आले नाही. अनेक विद्वान किरकोळ बाबीवर आगपाखड करतात, मग या गंभीर बाबीकडे डोळेझाक का केली. जिल्ह्यातील एकमेव पालिका आहे. जिथे सर्वात जास्त कर लादला जाणार आहे. याची कल्पना एकालाही का आली नाही.
अव्वाच्या सव्वा करवाढ करताना संबंधित पालिका अधिकारी व्यक्तीगत पातळीवर निर्णय घेवू शकत नाहीत. कोणाची तरी सहमती दर्शविल्याशिवाय इतका मोठा निर्णय होवू शकतो का? टपरी आणि छपरीने व्यापलेल्या शहरातील नागरीकांना कधीच दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले नाही. शहरातील रस्त्यावरुन प्रवास करताना हाडे खिळखिळे झाले पण अनेक वर्षांपासून चांगले रस्ते झाले नाहीत. जरी झाले तरी सहा महिन्यात पुन्हा जैसे थे.
दरम्यान वाढीव घरपट्टी बाबत नागरीकांच्या वाढत्या तक्रारीवरून आमदार आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याशी चर्चा करुन घरपट्टी कमी करण्याबाबत मध्यम मार्ग म्हणून 40 टक्के घरपट्टी भरण्याचा तोडगा काढत दिलासा दिला तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाढीव घरपट्टीच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषणाच्या माध्यमातुन पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आक्रोश व्यक्त करीत आम्हाला कोणतीही घरपट्टी वाढ नको आहे.जुन्या घरपट्टी प्रमाणे घरपट्टी आकारण्याबरोबर भाडे मुल्यानेच आकारण्याची मागणी लावून धरल्याने शहरातील वातावरण तणावाखाली आहे.
हजारो नागरीकांच्या हरकती, पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करणे, भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांचे उपोषण, आजी- माजी आमदार यांच्यातील मतभेद, दोन्ही गटातील वादविवाद, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे दररोज येणारे निवेदने यावरून पालिका प्रशासनाची विशेषतः मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची कोंडी झाली आहे. कोपरगावकरांना या सर्व प्रकारातुन दिवाळीच्या तोंडावर कसा दिलासा मिळतोय हे पहाणे महत्वाचे आहे.
पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष
आर. एस. कंट्रक्शन्स या कंपनीने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण चुकीचे केल्याने त्या पालिकेने वाढीव करवाढ रद्द केली. त्याच आधारे कोपरगाव नगरपालिके केलेला सर्वेक्षण चुकाचा असल्याने वाढीव कर वाढ रद्द करणार का तसेच भांडवली मुल्यावरून जुन्या भाडे मुल्याप्रमाणे कर आकारणी करणार की, नव्या भांडवली मुल्याने आकारणी कायम ठेवणार या निर्णयाकडे मालमत्ताधारकांचे लक्ष लागले आहे.
भविष्यात ज्येष्ठ नागरिकांचे गाव
अपेक्षित नागरी सुविधा नाहीत. म्हणूनच येथील मुळ रहीवाशी स्थलांतरीत होतोय. नवीन युवा पिढी मुंबई, पुणे व इतर शहरांना पसंदी देत असल्याने भविष्यात ज्येष्ठ नागरीकांचे गाव म्हणजे कोपरगाव अशी नवीन ओळख निर्माण होवु नये. इतक्या वाईट अवस्थेत असलेल्या कोपरगावचे मुल्य कधी वाढणार म्हणून चिंतेत असलेल्यांची चिंता कोपरगाव नगरपालिकेने काही क्षणात दूर करुन थेट मालमत्तेचे भांडवली मुल्य वाढवून घरपट्टीत पाचशे ते पाचशे पटीत वाढ केली.
=====================