नगर – संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत २०११ मध्ये उघडकीस आलेल्या १३ कोटी ३८ लाख ५५ हजार रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याच्यासह संचालक व व्यावस्थपकांसह २२ आरोपींना दोषी ठरवले आहे. आरोपींना सोमवारी (दि. ८) शिक्षा सुनावली जाणार आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी शनिवारी (दि.६) आरोपींना दोषी धरले. आरोपींमध्ये अध्यक्ष ज्ञानदेव सबाजी वाफारे, उपाध्यक्षा सुजाता ज्ञानदेव वाफारे यांच्यासह संचालक सुधाकर परशुराम थोरात, भाऊसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी दुबे, विष्णुपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी पंगाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोदे, व्यवस्थापक रवींद्र विश्वनाथ शिंदे, सोनेतारण विभागाचा शाखा व्यवस्थापक साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर तसेच संजय चंपालाल बोरा, अनुष प्रविण पारेख, मारुती खंडू रोहोकले, निमाजी खंडू रोहोकले, बबन खंडू रोहोकले, सुधाकर गोपीनाथ सुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे व संगिता हरिश्चंद्र लोंढे यांचा समावेश आहे.
संपदा नागरी पतसंस्था ही जिल्ह्यातील नावाजलेली संस्था होती. हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांपासून ते निवृत्त अधिकारी, नोकरदार वर्गाने विश्वासाने पतसंस्थेत पैसे ठेवले. एकूण ३९ कोटी ३४ लाख २४ हजार ४४१ रुपयांच्या ठेवी हाेत्या. सनदी लेखापरीक्षक देवराम मारुती बारस्कर यांनी सन २००९-२०१० या दोन वर्षांचे लेखापरीक्षण केले. त्यात संचालक मंडळाने ठेवीदारांच्या रकमेचा गैरवापर केल्याचे, स्वत:ला, नातेवाईकांना विनातारण कर्जवाटप केल्याचे, थकबाकीदारांवर कारवाई न केल्याचे समोर आले. सोने तारणातही अपहार आढळला. १ ऑगस्ट २०११ रोजी पतसंस्थेत १३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७ रुपयांचा घोटाळा झाल्याची फिर्याद पोलीस कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
स्वत:सह पत्नीच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता
पतसंस्थेचा अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याने स्वत:चे सेव्हिंग खाते उघडून त्यात पतसंस्थेतील जनतेच्या ठेवी वर्ग केल्या. त्यातील ४२ लाख ५५ हजार ५५० रुपयांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला. तसेच स्वत:च्या नावे १२ लाख रुपयांच्या मुदत ठेव पावत्या केल्या. त्याचे उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसताना स्वत:च्या व पत्नीच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता जमिनी खरेदी केल्या. त्याच्या पत्नीनेही पतसंस्थेच्या खर्चाच्या रकमा वाढवून त्यातून स्वत:च्या व मुलांच्या नावे मुदत ठेव पावत्या केल्या.
१३ वर्षे खटल्याचे कामकाज, २४ साक्षीदार तपासले
गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयात दीड हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले. १३ वर्षे खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी लेखापरीक्षक बारस्कर यांची साक्ष महत्वपूर्व ठरली, अशी माहिती सरकारी वकील अनिल ढगे यांनी दिली.