प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून, पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. मागील 24 तासांत खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून पाणीसाठ्यात 2.15 टीएमसीने वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 87 टक्के म्हणजे 25.23 टीएमसी झाला आहे. पानशेत धरण भरण्याच्या मार्गावर असून, धरणात 96.31 टक्के पाणीसाठा आहे.
खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील तीन-चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. खडकवासला धरण परिसरात बुधवारी दिवसभरात 5 मिमी, पानशेतमध्ये 30 मिमी, वरसगावमध्ये 34 मिमी आणि टेमघरमध्ये 60 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरणात पाण्याचा येवा वाढत आहे. मंगळवारी खडकवासला प्रकल्पात पाणीसाठा 23.08 टीएमसी होता. आता हा पाणीसाठा 25.23 टीएमसीवर पोहचला आहे.
भामा आसखेड फुल्ल
शहराच्या पूर्व भागात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. भामा आसखेड धरणसुद्धा बुधवारी 100 टक्के भरले असून, धरणाचे चार दरवाजे उघडून 620 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. भामा आसखेड धरणात 7.56 टीएमसी पाणीसाठा आहे.
धरणाचे नावपाणीसाठाटक्के
खडकवासला1.1262.17
पानशेत10.2596.31
वरसगाव11.1586.98
टेमघर2.6070.08
एकूण25.2386.56
(पाणीसाठी टीएमसीमध्ये)