न्यायालयाने 319 जणांना केली दंडात्मक शिक्षा : काहींचा परवानाही निलंबित
कारवाई आणखी तीव्र करण्याचा वाहतूक पोलिसांचा इशारा
पिंपरी – दारु पिऊन सुसाट वाहने चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अनेकदा कारवाई करतात. मात्र कारवाईनंतर काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. गेल्या दहा महिन्यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एक हजार 664 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत खटले दाखल केले. यापैकी 319 जणांना न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली. यापैकी काही जणांचा वाहन चालविण्याचा परवाना वाहतूक पोलिसांनी रद्द केला आहे.
दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे फक्त स्वतःचाच अपघात होत नसून त्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. यामुळे अशा वाहन चालकांवर पोलीस कारवाई करीत न्यायालयात खटलेही दाखल करतात. मात्र या खटल्यांचे काय होते, याबाबत माहिती समोर येत नसल्याने मद्यपी वाहन चालकांमध्ये कायद्याचा धाक राहत नाही. 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी एक हजार 664 मद्यपी वाहन चालकांवर खटले दाखल केले आहेत.
यामध्ये ऑगस्ट महिन्यात 449, सप्टेंबर महिन्यात 456 तर ऑक्टोबर महिन्यात 148 जणांवर दारू पिऊन वाहन चालविण्याबद्दल खटले दाखल करण्यात आले आहेत. दहा महिन्यांत दाखल केलेल्या खटल्यांपैकी 319 खटल्यांचा निकाल लागला असून संबंधित वाहन चालकाला पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या दंडाच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अनेक वाहन चालकांचा परवाना वाहतूक पोलिसांनी ठराविक कालावधीसाठी निलंबित केला आहे.
वाहतूक पोलिसांचा गनिमी कावा
पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असते. अशावेळी चालकाने मद्य प्राशन केल्याचा संशय आल्यास पोलीस त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवितात. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित वाहन चालकावर कारवाई केली जाते. अनेकदा पोलीस दारूचे दुकान किंवा हॉटेलपासून काही अंतरावर थांबतात. हॉटेलमधून बाहेर आलेल्या चालकाची तपासणी करून त्याच्यावर कारवाई करतात. हाच पुरावा न्यायालयात आरोपी वाहन चालकाला शिक्षा करण्यासाठी पुरेसा ठरतो.
“दारू पिऊन वाहन चालविणे हा कायद्याने गुन्हा तर आहेच. मात्र यामुळे स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. यापुढील मद्यपी वाहन चालकांवरील कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.”
– प्रसाद गोकुळे, वाहतूक पोलीस निरीक्षक, नियोजन शाखा