अहमदाबाद/बंगळुरू : स्वयंघोषीत भगवान नित्यानंद याच्या आश्रमातून आणखी दोन मुलींची सुटका करण्यात आली. त्याच्या आश्रमाच्या दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली. लहान मुलांचे अपहरण, त्यांना ताब्यात ठेवणे आणि त्यांचा छळ करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी या आश्रमावर छापे टाकले.
या दोन मुलींना तेथे राहण्याची इच्छा नव्हती. तरीही तेथे त्यांना डांबण्यात आले होते. त्यांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
या आश्रमाच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या मॉं प्राणप्रिया आणि मॉं तत्वप्रिया या दोघींना अटक करण्यात आली. अहमदाबादपासून सुमारे 50 किमी अंतरावरील हिरापूर गावात हा आश्रम स्थापन करण्यात आला आहे. या दोन्ही व्यवस्थापक स्वामी नित्यानंदच्या भक्त आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 364, 344, 323, 504, 506(2)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर बाल कामगार कायद्याखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
आश्रमात गेलेल्या पथकाने तेथील कर्मचारी आणि बालकांचे जबाब नोंदवून घेतले. त्यावेळी 13 वर्षांच्या दोन मुलींनी त्यांना तेथे राहण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलींना तेथून आणून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. आमच्या तपासात आरोपी आढळलेल्या प्राणप्रिया आणि तत्वप्रिया यांना अटक करण्यात आली, असे अहमदाबाद ग्रामीणचे पोलिस अधिक्षक आरव्ही अन्सारी यांनी सांगितले.
दरम्यान, स्वयंघोषित भगवान नित्यानंद याच्या संस्थेच्या बेकायदा ताब्यातून आपल्या दोन मुलींची सुटका करावी, या मागणी साठी एका दाम्पत्याने सोमवारी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली.
जनार्दन शर्मा आणि त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या दाव्यानुसार, स्वामी नित्यानंद याच्या बंगळुरू येथील संस्थेत त्यांच्या चार मुलींना दाखल केले होते. त्यावेळी त्यांचे वय सात ते पंधरा होते. नित्यानंद ध्यानपीठमच्या अहमदाबाद येथील शाखेत त्यांना पाठवण्यात आल्यचे त्यांना समजले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या मुलींना भेटू देण्यास पालकांना मज्जाव करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सहाय्याने त्यांनी आपल्या मुलींची भेट घेतली. त्यातील दोन अल्पवयीन मुलींच्या ताबा मिळवण्यात त्यांना यश आले. मात्र लोपमुद्रा जनार्दन शर्मा (वय 21) आणि नंदिता (वय 18) यांनी त्यांच्या सोबत येण्यास नकार दिला.
आपल्या मुलींचे अपहरण करून त्यांना बेकायदा डांबून त्यांचा छळ केला. त्यांना दोन आठवडे झोपू दिले नाही, अशी फिर्याद त्यांनी आश्रमाविरुध्द नोंदवली आहे. आपल्या मुलींचा ताबा बेकायदा घेणाऱ्या संस्थेच्या ताब्यातून मुलींची सुटका करावी आणि आपल्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी शर्मा दाम्पत्याने न्यायालयात केली आहे. त्याचबरोबर तेथे ठेवलेल्या अन्य अल्पवयीन मुलांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. स्वामी नित्यांदवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, याबातचे वृत्त समाज माध्यमांत आल्यानंतर नित्यानंद आश्रमातील व्यक्तींचा विशेषत: लहान मुलांचा कसा छळ करतो, याच्या अनेक कहाण्या यु ट्युबवर येत आहेत.