देहूगाव – देहूतील 14 अंगणवाड्यानां वर्गखोली, विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, बालचमूंना खेळण्यासाठी खेळणी, प्रांगण, स्वच्छतागृह नसल्याचे चित्र आहे. या अंगणवाड्या अनेक समस्यांच्या विळख्यात असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
देहू परिसरातील वाढत्या लोकसंख्यामुळे ग्रामपंचायतीचे पावणे तीन वर्षांपूर्वी नगरपंचायतीमधील रूपांतर झाले. देहू प्राथमिक शाळा, भीमाशंकर सोसायटी, विठ्ठलवाडी, वडाचा माळवाडी आणि बोडकेवाडी परिसरात सुमारे 14 अंगणवाड्या आहेत. प्रत्येक वर्गामध्ये किमान 45 ते 50 बालविद्यार्थी आहेत. शासकीय अंगणवाड्यांमध्ये बालकांना प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची ओढ आहे; मात्र वर्ग खोल्यांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा मोठा प्रश्न शिक्षण पुढे उभा आहे. वर्ग खोल्या नसल्याने आणि शासनाचे असणाऱ्या तुटपुंज्या निधीमध्ये भाड्याने खोल्या मिळत नसल्याचे तर तात्कलीन ग्रामपंचायत काळातील असलेले खोल्यांचे भाडेही थकित असल्याचे मोठे प्रश्न आहे.
काही अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने व वर्ग खोल्याण अभावी दोन वर्ग एकत्र बसविले जाते. त्यामध्ये शालेय पोषण आहार आल्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने दोन दिवस सुट्टी द्यावी लागते. शालेय आहाराचे वाटप झाल्यानंतर पुन्हा अंगणवाडी सुरू होते. प्रतिदिन बाल विद्यार्थ्यांना आहार देताना लहान खोल्यांमुळे समस्या निर्माण होत आहे.
बाल विद्यार्थ्यांसाठी प्रांगण,खेळणी,वर्ग खोल्यांना विद्युत पुरवठा,स्वच्छतागृह, शौचालय नाही तर शुद्ध पिण्याचा पाण्याचा ही मोठा प्रश्न असल्याचे दिसून येत आहे तर अपुरे शिक्षक,अंगणसेविका असल्याचेही प्रश्न निर्माण झाल्याने देहूतील अंगणवाडी यांना समस्यांचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.