गुवाहटी – सध्या मानव जंगली प्राण्यांच्या मुळावर उठलेला दिसत असल्याचे प्रकार घडत आहे. एकापाठोपाठ जंगली प्राणी मानवाच्या दुष्कृत्यामुळे मृत्यू होण्याची सध्या साखळीच निर्माण झाली आहे. अशीच एक घटना असाम राज्यात घडली आहे. असाम राज्यातील कच्छार जिल्ह्यात एका तलावात तब्बल 13 माकडे मृत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याविषयी एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोग्य इंजिनिअरिंग विभागाच्या जलाशयात माकडांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळले. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे मृतदेह बाहेर काढले आहेत. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या माकडांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच समजणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कुणीतरी या जलाशयात विष मिसळले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे विषारी पाणी प्यायल्यामुळे माकडांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.