पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी “सीईटी’ घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी झालेली आहे.
विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी 20 जुलैपासून सुविधा सुरू करण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस संकेतस्थळच बंद होते. त्यानंतर नवे संकेतस्थळ उपलब्ध करून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 2 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. अर्ज करायला मुदतवाढ द्यावी, अशी कोणाचीही मागणी राज्य मंडळाकडे आलेली नाही. त्यामुळे आता अर्ज करण्याला मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
करोनामुळे सुरक्षित वातावरणात ही परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्याचे नियोजन मंडळाकडून करण्यात येत आहे. सुरक्षित अंतराचे नियम पाळून एका परीक्षा केंद्रावर साधारण
300 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र देण्यात येणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
“सीईटी’साठी महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई बोर्ड व अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जाची माहिती संगणकीय प्रणालीत अपडेट होत असल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत काही वाढ होऊ शकते. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ असेल. राज्य मंडळाने सध्याच्या वेळापत्रकानुसारच “सीईटी’ घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, काही कारणास्तव काही बदल झाल्यास त्याची माहिती आवश्यकतेप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.