सातारा -जिल्ह्यातील पाच गुन्हेगारी टोळ्यांमधील 15 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या कार्यकाळातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर हद्दीत गायी, म्हशींची बेकायदेशीर कत्तल करून मांसाची वाहतूक करणाऱ्या तय्यब आदम कुरेशी (वय 36), हुसेन बालाजी कुरेशी (वय 47), जमील मेहबूब कुरेशी (वय 42), सद्दाम हसीम कुरेशी (वय 27), अर्शद जुबेर कुरेशी (वय 25), अमजद नसीर कुरेशी (वय 41, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) यांच्या तडीपारीचा प्रस्ताव फलटणचे पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी सादर केला होता. या सात जणांना सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर या तालुक्यांमधून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी निर्गमित केला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी, मारामारी, बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगणाऱ्या सनी माणिक जाधव (वय 26, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, मलठण, फलटण) व गणेश महादेव तेलगडे (वय 37, रा. मलठण, फलटण) यांना सातारा जिल्हा, माळशिरस, बारामती, पुरंदर व भोर या तालुक्यांमधून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे करणाऱ्या राकेश उर्फ मुन्ना जालिंदर घाडगे (वय 32, रा. कदम मळा, उंब्रज), शंकर उर्फ नाना लक्ष्मण शितोळे (वय 29), सोन्या उर्फ अनिकेत अधिक चव्हाण (वय 20, दोघे रा. अंधारवाडी, ता. कराड) यांना जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी व मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या प्रल्हाद उर्फ परल्या रमेश पवार (वय 19, रा. केसरकर पेठ, सातारा) व विकास मुरलीधर मुळे (वय 20, रा. पॉवर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा) यांना दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शिरवळ औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा प्रमुख संजय तुकाराम ढमाळ (वय 53, रा. केसुर्डी, ता. खंडाळा) व योगेश बाबासाहेब ढमाळ (वय 27) यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यू. आर. हजारे यांनी सादर केला होता.
त्यावर निर्णय घेऊन बन्सल यांनी दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. आतापर्यंतपोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आलेल्या 29 प्रस्तावांमध्ये 82 लोकांच्या हद्दपारीची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी 15 प्रस्तावांमधील 56 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित 14 प्रस्तावांमधील 26 जणांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने कळविले आहे.