जयंत कुलकर्णी
नगर – ज्या जिल्ह्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली, बॅंका, पतसंस्थाचे मोठे जाळे निर्माण झाले; त्या नगर जिल्ह्यात आजही सावकारकी जोमात सुरू आहे. खासगी सावकारांची संख्या बोकाळली असताना अधिकृत सावकारकी करणाऱ्यांची संख्या मात्र अल्प आहे. जिल्ह्यात अधिकृत सावकारकी करणाऱ्या व्यक्तींची संख्या 133 असून, या सावकारांकडून गेल्या आर्थिक वर्षात 4 हजार 999 कर्जदारांना तब्बल 10 कोटी 93 लाख 85 हजार रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यापैकी 8 कोटी 99 लाख 31 हजार रुपये कर्ज वसुली झाली आहे.
जिल्ह्यात 5 हजारांवर सहकारी पतसंस्थांचे जाळे आहे. जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंका मोठ्या प्रमाणावर आहेत, तरी त्या सर्व संस्था कर्जवाटप करण्याच्या प्रक्रियेत अपुऱ्या पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घ्यावी लागते. याच संधीचा लाभ उठवत 133 सावकारांनी तब्बल 10 कोटी 93 लाख 85 हजार रुपये कर्जवाटप केल्याचे वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यात कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यांत सावकारकीचा व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात परवानाप्राप्त सावकारांनी हे कर्जवाटप केले आहे. मात्र, अधिकृत सावकारांची संख्या अत्यल्प आहे. जिल्ह्यात अशा 133 सावकारांनी कर्जाचे वितरण केले. त्यावर 18 टक्के व्याज आकारले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही पिचले जात आहेत. गतवर्षी जिल्ह्यात 124 सावकार होते. यावर्षी त्यात 9ची भर पडून 133 सावकारांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक 27 सावकार नगर तालुक्यात आहेत. दि. 31 मार्च 2022पर्यंत 124 सावकारांनी 5 हजार 515 कर्जदारांना तब्बल 11 कोटी 80 लाख 47 हजार रुपये कर्जवाटप केले होते. मात्र, गेल्या वर्षी 31 मार्च 2023पर्यंत सावकारांची संख्या 9ने वाढली असून, कर्जदार कमी झाले आहेत. त्यात कर्जवाटपदेखील कमी झाले आहे.
शेतकऱ्यांना तारण कर्ज नऊ टक्के दराने, तर विनातारण कर्ज 12 टक्के दराने दिले जाते.
शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना गहाण कर्ज 12 टक्के, तर विनागहाण कर्ज तब्बल कर्ज 18 टक्के व्याजदराने दिले जाते. शासकीय अध्यादेशानुुसार आकारण्यात येत असलेले हे व्याजदर शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांवर अन्याय करणारे आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची कर्जाच्या जाचातून मुक्तताच होत नाही. अधिकृत आणि अनधिकृत सावकारांची संख्या जिल्ह्यात सतत वाढत आहे. सावकारी पाश अधिकच गडद होत आहे. यातून शेतकरी आणि सामान्य जनतेची कधी सुटका होईल, हे सांगणे कठीण आहे.
अनधिकृत वाटप कोट्यवधींच्या घरात
जिल्ह्यात मोजकेच 133 सावकार परवानाप्राप्त असल्याचे दिसून येते. त्यांनी केलेले कर्जवाटप रेकॉर्डवर येते. मात्र, अवैध सावकारांनी वाटलेले कर्ज कधीच रेकॉर्डवर येत नाही. अशा सावकारांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यांनी वाटलेले कर्जही कोट्यवधींच्या घरांत आहे. मात्र, त्याची कुठेच नोंद नाही. त्यामुळे हा आकडा गुलदस्त्यात आहे! विशेष म्हणजे अवैध सावकार गहाण म्हणून चक्क शेताची खरेदी करीत असल्याचेही अनेकदा उघड झाले आहे. मात्र, या अवैध सावकारीला पायबंद घालण्यास सहकार यंत्रणा अपयशी ठरत असल्याने त्यांचे फावत आहे.
तालुकानिहाय सावकारांची संख्या
नगर – 27, संगमनेर – 11, पारनेर – 6, श्रीगोंदा – 16, कर्जत – 7, जामखेड – 5, पाथर्डी – 4, शेवगाव – 1, नेवासा – 3, श्रीरामपूर – 19, कोपरगाव – 7, राहाता – 10, राहुरी – 9, अकोले – 8.