पुणे -राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागात भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात थेट विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे “ओव्हररायटिंग’ केलेला भाग वगळून उत्तरपत्रिकेतील उर्वरित गुणांचे मूल्यांकन करून सर्व विद्यार्थ्यांचा निकालही जाहीर करण्यात आला आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी भौतिकशास्त्र विषयाच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद विभागीय कार्यालयाअंतर्गत उघडकीस आला. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली. राज्य मंडळाकडूनही या प्रकाराची चौकशी करण्यात आली. मात्र संबंधित विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, चौकशी समितीच्या अहवालातून 372 उत्तरपत्रिकांमध्ये ओव्हररायटिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात थेट विद्यार्थ्यांचा सहभाग नसल्याने सर्वांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत सर्वच विद्यार्थ्यांना गुण
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत सहा गुणांचे प्रश्न चुकल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, या चुकांबाबत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळाने जाहीर केला होता. त्यानुसार जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात आल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.