मध्य प्रदेशातील जनता शिवराज सिंह यांना सतत पाहून कंटाळलेली असताना तशाच भावना राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मनातही निर्माण होत असून तसा धोकाही निर्माण झाला आहे.
भाजपचे माजी मंत्री दीपक जोशी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर सत्यनारायण सत्तन आणि माजी आमदार भंवरलाल सिंह शेखावत यांचेही नावे चर्चेत आहे. कॉंग्रेसमध्ये नव्याने उत्साह भरला जात आहे आणि पुढच्या लढाईसाठी तयारी केली जात आहे. एकीकडे कॉंग्रेसला पेढे वाटण्याचा अधिकार आहे, तर भाजपला मात्र आपले घर ठिकठाक करण्याचे आव्हान आहे. घराची नियमित साफसफाई कशी राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दीपक जोशी यांचा कॉंग्रेस प्रवेश भाजपसाठी धक्कादायक आहे.
देवास जिल्ह्यातील भाजपकडून तीन वेळेस आमदार राहिलेले दीपक जोशी हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे चिरंजीव. त्यांचे कुटुंब जनसंघाच्या काळापासून एकाच विचारसरणीत वाढलेले आहे. त्यांचे कॉंग्रेसमध्ये जाणे पक्षासाठी चिंताजनक बाब आहे. 60 वर्षीय दीपक जोशी हे भाजपच्या तिकिटावर 2000 मध्ये बागली, 2003 आणि 2008 मध्ये हाटपिपलियातून आमदार झाले. ते शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये राज्यमंत्री देखील राहिले आहेत. अर्थात 2018 मध्ये पराभूत झाले. कॉंग्रेसचे मनोज चौधरी यांनी त्यांना हाटपिपलिया मतदारसंघूत पराभूत केले.
पराभूत झाल्यानंतरही ते या भागात सक्रिय होते. परंतु ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आगमनानंतर या क्षेत्राचे राजकीय समीकरण बदलले. मनोज चौधरी हे शिंदे यांच्यासमवेत भाजपमध्ये आले. परिणामी पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर दीपक जोशी हे विजनवासात गेले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अनेकदा पक्षाच्या विरोधात मते मांडली आहेत. हाटपिपलिया येथे प्रस्तावित कैलास जोशी यांच्या स्मारकाप्रती सरकारची उदासीनता राहिल्याने ते नाराज होते. प्रत्येक ठिकाणी हा मुद्दा मांडला. शेवटी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रत्यक्षात ते भाजपचे भविष्य होते आणि ते कोणत्याही स्थितीत कॉंग्रेसचे घर उजळवून टाकणारे नव्हते. सत्तन आणि शेखावत देखील कोठेही जाणाऱ्यातले नाहीत; परंतु त्यांनी आवाज उठवणे स्वाभाविक आहे आणि तार्किकही. वास्तविक आगामी विधानसभा निवडणुकीवरून भाजपसमोरची अडचण दीपक जोशी, सत्तन आणि शेखावत यांचा हल्लाबोल नाही तर संघटनात्मक त्रुटी आहेत आणि या आताच्या नसून गेल्या तीन दशकांपासून कायम आहेत. या घटनांतून एकच तात्पर्य निघते आणि ते म्हणजे भाजपमधील असंतोष आणि बंडाळीची धग तीव्र होत आहे.
प्राथमिकदृष्ट्या हे योग्य आहे. शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रिपदाची चौथी टर्म ही निष्कलंक नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली 2018 रोजी निवडणुकीत भाजपचा पराजय झाला. पण ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रवेशाने सरकारची वापसी झाली. त्यांच्या शपथविधीला भाजपचे बडे नेते हजर नव्हते, परंतु पक्षश्रेष्ठींचा निर्णय सर्वांनी मान्य केला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी पोटनिवडणुकीत स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. जुन्या लोकांना बाजूला करण्यात आले. त्यानंतर संघटनात्मक पातळीवर आणि सरकारी पातळीवर झालेल्या चुका आणि शिवराज सिंह यांची अपरिहार्यता पाहिल्यास त्याचे परिणाम आता दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, दीपक जोशी यांचा कॉंग्रेस प्रवेश आणि जुन्या नेत्यांची वक्तव्ये यामुळे भाजपला फारसे नुकसान होणार नाही, पण संघटनात्मक पातळीवर असणाऱ्या त्रुटींमुळे सर्वाधिक फटका बसू शकतो.
मध्य प्रदेशमध्ये भाजप हा मूळ जनसंघ आणि संघाची विचारधारा बाळगणाऱ्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांच्या फळीवर अवलंबून आहे. पण या तीन वर्षांत या मंडळीत निर्माण होणारा असंतोष, नाराजीचे सूर हे अनाठायी म्हणता येणार नाहीत. एकीकडे शिंदे समर्थकांना सामावून घेतल्याने निर्माण झालेली तेढ आणि भाजपला कमकुवत करणारे निर्णय पाहता त्याचा अधिक फटका पक्षाला सहन करावा लागत आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. प्रत्यक्षात मार्च 2020 मध्ये नवे सरकार आल्यानतंर संघटनेची व्यवस्था बदलली. यात प्रमुख म्हणजे 40 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नेत्यास मंडळाचा अध्यक्ष न करणे आणि 50 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तीला जिल्ह्याचा अध्यक्ष न करणे. या निर्णयामुळे एका फटक्यात मध्य प्रदेशातील जुने, कडवे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजेला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या निर्णयाच्या संभाव्य दुष्परिणामाची तीव्रता पक्षाच्या प्रमुखांना समजली नाही.
आता निवडणुकीच्या काळात हेच मुद्दे विक्राळ रूप धारण करताना दिसत आहेत. सत्तन आणि शेखावत यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांतील अस्वस्थता ही याच निर्णयाचा परिपाक आहे. मध्य प्रदेश भाजपची बांधणी कमकुवत होण्यास एवढे एकच कारण नाही, तर आणखी काही गोष्टी आहेत की त्यामुळे संघटनात्मक बांधणीवरून चर्चा तर कधी वादही निर्माण झाले. पहिले कारण म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीकडून मुरलीधर राव यांना प्रदेशचे प्रभारी म्हणून नेमणे आणि हितानंद शर्मा यांना प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्त करणे. हे दोघेही राज्यातील कार्यकर्ता आणि नेता यांच्यात समन्वय आणि ऐक्य ठेवण्यात यशस्वी ठरले नाहीत. त्यांना राज्यातील भाजपची नसच ओळखता आली नाही, एवढेच नाही तर ते अनेक ठिकाणी स्वत:च्या वक्तव्यावरून चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकले.
एकेकाळी कृष्ण मुरारी मोघे, कॅप्टन सिंह सोळंकी, सुहास भगत यांनी ज्या रितीने भाजपची संघटनात्मक बांधणी केली ती आता दिसून येत नाही. मध्य प्रदेश भाजपमध्ये असंतोष पसरण्यामागे दुसरे कारण म्हणजे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान. त्यांना चौथ्यांदा मुख्यमंत्री केल्याने पक्षांतर्गत नाराजीचे सूर आहेत. अनेक नेत्यांनी यासंदर्भात दिल्लीत श्रेष्ठींकडे गाऱ्हाणी मांडली, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि शिवराज सिंह हेच पदावर कायम राहिले आहेत.
गेल्या वर्षभरापासून नेतृत्व बदलावरून जोरात चर्चा सुरू होती, अफवाही पसरल्या. पण बदल झाला नाही. आता याबाबतीत खूप उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटकात भाजपच्या विरोधात कौल गेल्याने त्यापासून धडा घेत मध्य प्रदेशात नेतृत्वबदल होऊ शकतो, असा तर्क मांडला जात आहे. मात्र, सध्या तशी कोणतीच हालचाल दिसून येत नाही. तूर्त मध्य प्रदेशात भाजपसमोर अनेक आव्हाने आहेत. सध्याच्या काळात कितीही असंतोष असला आणि तो तात्पुरता असला तरी त्याची वेळीच दखल घेतली नाही किंवा तोडगा काढला नाही तर जखम चिघळण्याची शक्यता राहू शकते. चाणाक्ष विरोधक हा अशाच अनुकूल वातावरणाच्या संधीच्या शोधात असतो.
आकाश व्यास