नगर – यंदाच्या खरीप हंगामासाठी तब्बल 4 हजार 996 कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला 2 हजार 713 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार बॅंकेकडून एप्रिल महिन्यापासून खरीप हंगामासाठी पिक कर्जाचे वाटप सुरू केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र 5 लाख 80 हजार 507 हेक्टर आहे त्यात दरवर्षी काही प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. यंदा 6 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात खरीप तृणधान्यासाठी 1 लाख 78 हजार 300, कडधान्यासाठी 1 लाख 81 हजार 800, गळीत धान्यासाठी 1 लाख 57 हजार 630 हेक्टर पिकांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यंदा कापूस पिकासाठी क्षेत्र वाढविण्यात आले आहे.
1 लाख 32 हजार हेक्टर उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पिकानिहाय क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे. भात-16 हजार हेक्टर, बाजरी- 91 हजार हेक्टर, मका- 71 हजार हेक्टर, तूर- 56 हजार हेक्टर, मूग- 48 हजार हेक्टर, उडिद- 9 हजार 800 हेक्टर, सोयाबीन- 1 हजार 52 हजार हेक्टर याप्रमाणे प्रमुख पिकांसाठी क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पतपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. व्यापारी बॅंकांसाठी 2 हजार 256 कोटी 44 लाख, ग्रामीण बॅंकांना 36 कोटी 61 लाख तर जिल्हा बॅंकेला 2 हजार 713 कोटी रुपये शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याचे उद्दिष्टे देण्यात आले आहे.
व्यापारी बॅंकेचे 2 हजार 362 खातेदार असून त्यांना आतापर्यंत 43 कोटी 13 लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहेत. ग्रामीण बॅंकांचे 10 चातेदार असून त्यांना 29 लाख रुपये तर जिल्हा बॅंकेचे 12 लाख 8 हजार 471 खातेदार असून त्यांना 874 कोटी 45 हजार रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. सर्व बॅंकांचे 13 लाख 843 खातेदार असून त्यांना 917 कोटी 87 लाख रुपये पतपुरवठा करण्यात आला आहे.
तसेच रब्बी हंगामासाठी पतपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. 2 हजार 233 कोटी 93 लाख रुपये नियोजन केले असून त्यात व्यापारी बॅंकांसाठी 1 हजार 215 कोटी 61 लाख, ग्रामीण बॅंकांसाठी 14 कोटी 37 लाख तर जिल्हा बॅंकोंसाठी 1 हजार 3 कोटी 95 लाख असे नियोजन करण्यात आले आहे.