पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी १० हजार किलोची मिसळ तयार करण्यात आली. १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा तब्बल २,५०० किलो वजनाच्या कढईमध्ये ही मिसळ तयार करण्यात आली. हा उपक्रम गंजपेठेतील महात्मा जोतीबा फुले वाडा येथे राबविण्यात आला.
आयोध्येत सात हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा करण्यासाठी वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही १० हजार किलो मिसळ तयार केली.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ,
बाळासाहेब शिवरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वाद घेतला. प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, नंदा पंडीत, सारंग सराफ, रवी चौधरी, सुशीला नेटके, विजय रजपूत, एकनाथ ढोले, बाळासाहेब अमराळे, सुनीता काळे, संतोष पंडित, पीयूष शहा, रुपेश चांदेकर, महेंद्र मारणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला.
उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनवण्यासाठी एक हजार किलो मटकी, ८०० किलो कांदा, २०० किलो आलं, २०० किलो लसूण, ७०० किलो तेल, १४० किलो मिसळ मसाला, लाल मिरची पावडर ४० किलो, हळद पावडर ४० किलो, मीठ ५० किलो, खोबरा कीस १४० किलो,
तमाल पत्र ७ किलो, फरसाण २५०० किलो, पाणी १०,००० लिटर, कोथिंबीर १२५ जुडी, लिंबू १००० नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच मिसळ खाण्यासाठी डिस्पोजेबल डिश ५० हजार, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास ५० हजार यासह स्लाईड ब्रेड १.५ लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे.
दि. १४ एप्रिललाही उपक्रम…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक १४ एप्रिललाही पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १० हजार किलो मिसळ आणि ताक तयार करुन अभिवादनाकरीता येणाऱ्या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. १४ एप्रिलला सकाळी सात वाजल्यापासून याचे वाटप केले जाणार आहे.
पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. मिसळ हे निमित्त आहे, एकत्र येण्याचे आणि महापुरुषांना वंदन करण्याचे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.