मुंबई – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या बॅंकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात स्टेट बॅंक ऑफ इंडियासह (SBI) इंडियन बॅंक (Indian Bank) आणि पंजाब ऍण्ड सिंध बॅंकेचा (Punjab and Sindh Bank) समावेश आहे. आरबीआयने या तीन बॅंकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
बॅंकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारे केवायसी नियम, मनी लॉंड्रिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. आरबीआयने पेनल्टी लोन आणि ऍडव्हान्स बाबत रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नसल्याने एसबीआयला 1.30 कोटींचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने 31 मार्च 2021 रोजी बॅंकेच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी आरबीआयला रिस्क असेसमेंट रिपोर्टमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर आरबीआयने नोटीस जारी केली.
बॅंकेकडून नोटिशीला उत्तर देण्यात आले. वैयक्तिक सुनावणीत तोंडी सादरीकरण केल्यानंतर बॅंकेकडून अतिरिक्त माहिती देण्यात आली. मात्र, आरबीआयचे समाधान न झाल्याने बॅंकेला दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने इंडियन बॅंकेला 1.62 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसी निर्देशांचे पालन न केल्याने आणि ठेवींबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड इंडियन बॅंकेवर लावण्यात आला आहे. आरबीआयने पंजाब ऍण्ड सिंध बॅंकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.