नवी दिल्ली – देशभरात “वंदे भारत’ एक्सप्रेसची संख्या सातत्याने वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी आणखी नऊ नवीन “वंदे भारत’ला हिरवा कंदिला दाखविला आहे. यामुळे देशातील अनेक राज्यांतील प्रवाशांना प्रवास जलद करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, पुढील सहा महिने वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेज फूड दिले जाणार नाही, असा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सूचना आणि तक्रारींच्या आधारे रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.
रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, बेकरी प्रोडक्ट्स, वेफर्स, मिठाई, कोल्ड्रिंक्स इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या आत फेरीवाल्यांमुळे होणारी समस्या, ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा जास्त साठा आणि दरवाजे वारंवार उघडणे यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. या गोष्टी लक्षात घेऊन वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेट फूड वस्तूंच्या विक्रीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.