अहमदाबाद – देशभरात करोनाने थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात रुग्णवाढ होत होती. त्यामुळे महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर करोनाचा विस्फोट गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये अनेकांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटींग होती. तर न्यायालयाने देखील गुजरात सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्यातच आता गुजरातमध्ये करोनामुळे झालेल्या मृतांची संख्या लपविल्याचा आरोप होत आहे.
अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांमध्ये गुजरातमधील सर्वाधिक करोना रुग्ण आहेत. मात्र मृतांची संख्या वाढली असताना सरकारी खात्यांनी दिलेल्या आकडेवारीने शंका उपस्थित करण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये गेल्या 71 दिवसात तब्बल 1.23 लाख मृत्यूदाखले वितरीत करण्यात आले आहेत. मात्र करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 4218 इतकीच दाखवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मृत्यू होऊनही केवळ 4 हजार रुग्णांचा मृत्यू करोनाने झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. मात्र हे न पटणारं आहे.
‘दिव्य भास्कर’च्या वृत्तानुसार 1 मार्च 2021 पासून 10 मे 2021 पर्यंतच्या कालावधीत गुजरातमधील 33 जिल्हे आणि 8 महानगरांमध्ये 71 दिवसात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात गुजरातमध्ये एकूण 26 हजार 026 इतके मृत्यू दाखले वितरीत केले गेले. तर एप्रिलमध्ये ही संख्या 57,796 वर पोहोचली. तर मे महिन्याच्या 10 दिवसातील आकडा 40,051 इतका आहे. सरकारी आकडेवारी खुपच कमी दाखविण्यात आली आहे.