जळगाव – ईदसाठी मुंबईहून हावडा येथे घरी जाण्यासाठी निघालेल्या तरूणाचा धावत्या रेल्वेतून पाय घरसून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना हावडा मेल पाचोरोऱ्याहून जळगावकडे येत असताना घडली. अबजूर शेख जियाऊल हक (वय 23, रा. रहिमपूर, माणिकचक, इनायतपूर, जि. मालदा पश्चिम बंगाल) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल येथील रहिवासी अबजूर शेख जियाऊल हक हा तरूण नवी मुंबईतील घनसोली येथे गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो त्याचा मसीद उर रहेमान सोबत रमजान ईदसाठी मुंबईहून पश्चिम बंगाल येथील गावी जाण्यासाठी सकाळी 8 वाजता मुंबईहून निघाला होता.
मुंबई-हावडा मेल पाचोऱ्याहून जळगावकडे येत असताना अबजूर पाणी पिण्यासाठी जात असताना रेल्वेच्या बोगीच्या दरवाजाजवळ पाय घसरून खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रेल्वे खांबा (क्र. 400/ 13-15) जवळ घडला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून भाचा मसीद ऊर रेहमानच्या ताब्यात देण्यात आला. मयत तरूण हा अविवाहित असून त्याच्या पश्चात चार बहिणी, तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे.