नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमीत्त जो अमृतमहोत्सव देशभर साजरा केला जाणार आहे त्याचा प्रारंभ 12 मार्च पासून साबरमती येथून होणार आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना दिली असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुमारे वर्षभराच्या कालावधीनंतर भाजप संसदीय पक्षाची प्रथमच ही बैठक झाली.
त्यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याच्या निमीत्ताने 75 आठवडे देशाच्या 75 ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याची सुरूवात साबरमतीपासून होणार आहे. पंतप्रधानांनी यावेळी खासदारांना कोविड लसीकरणाच्या संबंधात नागरीकांमध्ये जागृती करण्याचेही आवाहन केले. या लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा यासाठी खासदारांनी नागरीकांना उद्युक्त करावे आणि त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची वगैरेही सोय त्यांनी उपलब्ध करून द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमीत्त होणाऱ्या कार्यक्रमातही खासदारांनी सक्रिय योगदान देऊन नागरीकांनाही यात सहभागी करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीत कोविडचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जे सक्षम नेतृत्व केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांचेही यावेळी भाषण झाले.