मुंबई : राज्यात शिवसेनेनच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सांगितले.दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत येत्या दोन ते तीन दिवसांत सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर पक्षाच्या नवर्विाचित आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्याला ठाकरे मार्गदर्शन करत होते, राज्यात सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यात जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा फोनही आला नाही. त्यामुळे शिवसेनेने युती तोडली हा आरोप चुकीचा आहे. शिवसेनेला त्यांचा हक्क हवा होता. तो देण्यास नकार दिल्याने युतीची प्रक्रिया थांबली. शिवसेनेने युती तोडली ही भाषा शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्यासाठी केली जात आहे, असे ठाकरे म्हणाले असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.
या बैठकीत आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली. आम्हाला उध्दवजी मुख्यमंत्री म्हणून हवे असतील तरी ते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द असेल, असे शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत एकत्र राहणार आहेत. याआधी आमदारांनी जयपूरला नेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदार उदय सामंत म्हणाले, शिवसेनेच्या आमदाराला कोणी फोडू शकत नाही. तसेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री निवडीचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. ते सांगतील तो निर्णय अंतिम आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची मागणी होती ती आम्ही समोर ठेवली आहे. सर्व आमदारांना एकत्रित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्राचं नेतृत्त्व उद्धव ठाकरेंनी करावे हीच आमदारांची इच्छा आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हे एकमेव नाव चर्चेत असून इतर कोणाच्याही नावाची चर्चा नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.