कवी वाघ ः राजगुरुनगरला पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार वितरण
राजगुरूनगर -संसार सावरण्यासाठी आणि जगण्यासाठी बदलत्या ऋतूत वसंत शोधताना संघर्ष करीत शेतकरी सगळे पर्याय आजमावून पाहतो. त्याच्यासाठी मायबाप असलेले सरकार शेवटचा पर्याय असते; मात्र दुर्दैवाने सरकारी धोरणात शेतकरी कुठेच नसतो. गेल्या अनेक वर्षांत हेच घडत आल्याने जगण्यासाठीचे घास कमी होऊन शेतकऱ्याचे जीवन संपवण्याचे फास वाढले असल्याची खंत लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी राजगुरूनगर येथे केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखा, ग्रामपंचायत पूर आणि कै. नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंती निमित्त राजगुरुनगर येथे रविवारी (दि. 23) पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार वितरण समारंभ व कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोककवी डॉ. विठ्ठल वाघ बोलत होते.
यावेळी माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मुकुंद आवटे, ऍड. सतीश गोरडे, कवी संतोष गाढवे, भीमराव पाटील, नंदा भोर, सदा अमराळे, धर्मराज पवळे आदी मान्यवर, पुरस्कारार्थी तसेच तालुक्यातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी घामाच्या डोळ्यात आसवांच्या धारा; हाडाच्या काड्यांना एकादशीचा थारा, भरमसाठ मेहनत करून पोट भर जेवता न येणाऱ्या शेतकऱ्याला उपवासाचा दिवस आल्यावर समाधान मिळते ही माझ्या देशाची व्यथा 70 वर्षांनंतर आजही कायम आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण न राबविणाऱ्या सरकारी धोरणावर खडसून टीका केली. शेतकरी आत्महत्यांवर बोलताना त्यांनी काही कविता अक्षरशः रडत रडत सादर केल्या. ‘कोरडे जे शेत आहे, ओलित झाले पाहिजे! मुक्या जीवांचे दुःख बोलीत आले पाहिजे.’ ही कविता त्यांनी सादर केली.
यावेळी गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्यरत्न पुरस्कार देऊन, तसेच पुरुषोत्तम सदाफुले यांना स्व नारायण मेघाजी लोखंडे कामगारभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच नवोदित कवी, लेखक यांनाही पुरस्कार देण्यात आले. दादाभाऊ गावडे यांनी कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.