बहात्तरच्या दुष्कळात बांधले होते तळे
धामणी- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांपैकी शिरदाळे गावाला सध्या तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तीनशे ते चारशे लोकसंख्या असणाऱ्या गावची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ माळराण, कोरडवाहु जमीन अशी आहे. बहात्तरच्या दुष्कळात बांधलेले गावतळ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे शिरदाळे गावावर पाण्याचे संकट आले आहे.
तसेच पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने ज्या वर्षी चांगला पाऊस होईल त्याचवर्षी दोनही हंगामात शेतात चांगले उत्पन्न मिळते. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो. हा परिसर डोंगराळ भागात उंचीवर असल्याने येथे वर्षाला फक्त जेमतेम दोनच पिके निघतात. एक म्हणजे पावसाळी बटाटा आणि रब्बी हंगामात ज्वारी.
चालू वर्ष वगळता गेल्या पाच वर्षात तर बटाटा पिकाने शेतकऱ्यांना पुरते झोपवले आहे; परंतु या वर्षी चांगल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू आणले खरे पण गेल्या पन्नास वर्षात प्रथमच या वर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसामुळे रब्बी हंगाम वाया गेला आहे. अनेक कुटूंब अन्य गावी स्थलांतरीत झाली तर गावातील महिला नदीकाठच्या गावी मजुरीने कामाला जाऊ लागल्या आहेत. गावात फक्त 25 ते 25 टक्के जनावरे शिल्लक आहेत. अनेकांनी अपली जनावरे विकून टाकली आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती येथील शेतकऱ्यांवर आली असून चारा टंचाईवर मात करण्यासाठी उसाचे वाढे, गव्हाचे सळवण, मुरघासवर अवलंबून राहावे लागत आहे.
1972च्या दुष्काळानंतर गावची तहान भागविण्यासाठी तळे बांधले होते. हे तळे आजवर शीरदाळे गावची तहान भागवत होते. दोन वर्षांपूर्वी तळ्यातील गाळ काढल्याने पाणीसाठा वाढला असला तरी या वर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे तळ्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. वाफगाव पासून लोणीपर्यंतची जनावरे या तळ्यात उन्हाळ्यात आपली तहान भगवतात. तसेच मेंढपाळ देखील याच पाण्याचा आधार घेत परिसरात वास्तव्य करीत असतात. आज मात्र, बहात्तरच्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार झालेले हेच तळे आपले पाणी वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. 2003 नंतर प्रथमच हे तळे पूर्ण आटण्याची भीती निर्माण झाली आहे. गावात आजही टॅंकर चालू असला तरी गावतळे मोठा आधार बनले आहे.